नाशिक – इगतपुरी तालुक्यात धरणांची सुरक्षा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. रविवारी वैतरणा धरणात पोहण्यासाठी गेलेल्या कुटूंबातील १२ वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू झाला. एकाचा मृतदेह अद्याप मिळालेला नाही. या प्रकरणी घोटी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

सध्या उन्हाची तीव्रता वाढत असल्याने अनेक जण धरण, तलावात पोहण्यासाठी जात असतात. रविवारी दुपारी मुंबईहून आलेल्या पर्यटकांपैकी काही जण हे वैतरणा धरण परिसरात गेले होते. त्यापैकी लक्ष मगरे (१२, रा. कल्याण) हा धरणात पोहण्यासाठी उतरला असता पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाला. त्याचा मृतदेह पाण्याबाहेर काढून सरकारी रुग्णालयात विच्छेदनासाठी नेण्यात आला. दुसरीकडे, त्याला वाचविण्यासाठी एक जण पाण्यात उतरला. परंतु, तोही बुडाला. रविवारी सायंकाळपर्यंत तो सापडला नव्हता.