जळगाव : शहरातील कांचननगरात रविवारी रात्री झालेल्या गोळीबाराच्या घटनेत आकाश उर्फ टपऱ्या बाविस्कर, या तरुणाचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी टपऱ्याचा खून केल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल असलेला आकाश उर्फ डोया सोनवणे आणि त्याच्या एका साथीदाराला ताब्यात घेतले आहे. न्यायालयात हजर केल्यानंतर दोघांची सोमवारपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली.
कांचननगर परिसरातील एका पार्टीदरम्यान ‘लाडू गँग’च्या सदस्यांमध्ये वर्चस्वाच्या वादातून रक्तरंजित संघर्ष झाला. पोलिसांना कुंटणखान्याची माहिती दिल्याच्या संशयावरून आकाश उर्फ डोया सपकाळे आणि सागर सपकाळे यांच्यात तीव्र बाचाबाची झाली. वाद चिघळत गेल्यानंतर आकाश आणि त्याचा साथीदार करण उर्फ तांडव राजपूत यांनी गावठी बंदुकीतून अंधाधुंद गोळीबार केला.
गोळीबारात घटनास्थळी उपस्थित आकाश उर्फ टपऱ्या बाविस्कर या तरूणाच्या छातीत गोळी घुसली. गंभीर जखमी अवस्थेत त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र, डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले.
गोळीबारात गणेश सोनवणे, तुषार सोनवणे आणि सागर सपकाळे हे तिघेही जखमी झाले होते. त्यांनाही तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, शनिपेठच्या पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर तातडीने घटनास्थळी पोहोचले.
स्थानिक गुन्हे शाखेसह शनिपेठ पोलिसांनी गोळीबारानंतर फरार संशयितांचा शोध सुरू केला. या प्रकरणी आकाश उर्फ टपऱ्याच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनंतर आकाश उर्फ डोया सपकाळे तसेच गणेश उर्फ काल्या सोनवणे, विक्की चौधरी, सागर पाटील, तुषार उर्फ साबू सोनवणे आणि करण पाटील यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. गोळीबाराच्या घटनेनंतर मुख्य संशयित आकाश उर्फ डोया सपकाळे आणि करण पाटील हे दोघे पसार झाले होते.
पोलीस गोळीबारातील संशयितांच्या मागावर असताना ते शहराच्या आजूबाजूच्या गावांमध्ये लपून बसल्याचे पोलिसांना समजले. प्रत्यक्षात, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांना दोघे संशयित जळगावमधील डीमार्ट परिसरात आल्याची माहिती मिळाली. त्यानुसार, पोलीस पथकाने तातडीने कारवाई करत दोघांना मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले. संशयितांना शनिपेठ पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.
तपास अधिकाऱ्यांनी बुधवारी आकाश सपकाळे आणि करण पाटील यांना न्यायालयात हजर केले असता, त्या दोघांना १७ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
दरम्यान, जिल्ह्यात पोलिसांचा धाक न राहिल्याने खेळण्यातील बंदुकांप्रमाणे खऱ्याखुऱ्या बंदुक घेऊन फिरणाऱ्या गल्लीबोळातील दादांची संख्या अलीकडे मोठ्या प्रमाणात वाढली आहे. जळगाव शहरातील औद्योगिक वसाहतीत जी सेक्टरमध्ये अवैध दारू अड्ड्यावर एकाने केलेल्या गोळीबारात दोन तरुण कामगार जखमी झाल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. पैकी एका कामगाराचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. गावठी बंदुका घेऊन फिरणाऱ्यांची मजल थेट गोळीबारापर्यंत गेल्याने जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेची स्थिती अलीकडे चिंताजनक बनली आहे. सामान्य नागरिकांमध्ये त्यामुळे भितीचे वातावरण पसरले आहे.
