जळगाव : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेत (एकनाथ शिंदे) ठाकरे गटासह शरद पवार गटाच्या शहरातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गुरूवारी प्रवेश केला. पक्षाचे नेते तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे आदी उपस्थित होते.
संघटन हेच आपले सर्वात मोठे शस्त्र असून, सत्ता मिळवणे आपले ध्येय नाही. लोकांचा विश्वास जिंकणे हेच आपले खरे बळ आहे. जळगाव शहराच्या विकासासाठी आणि भविष्यासाठी ही एकजूट निर्णायक ठरणार आहे. जुने-नवे सर्व कार्यकर्ते एकत्र राहून नियोजनबद्ध पद्धतीने काम करा आणि युतीचा झेंडा जळगाव महानगरपालिकेवर फडकवा, असे आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पक्ष प्रवेश कार्यक्रमात केले.
इतर पक्षांमधून होत असलेला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा हा प्रवेश म्हणजे विकासाची पावती आहे, असे शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे म्हणाले. पालकमंत्री पाटील यांनी जळगाव महापालिकेसाठी आतापर्यंत सर्वाधिक निधी उपलब्ध करून दिला आहे. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातूनही रस्ते, गटारी आणि इतर मूलभूत कामांसाठी मोठ्या प्रमाणावर निधी मिळाल्यामुळे शहराला विकासाची नवी दिशा मिळाली आहे, असेही जिल्हाप्रमुख भंगाळे यांनी नमूद केले.
माजी नगरसेवक अण्णा भापसे, चंद्रकांत भापसे, विशाल राठोड, जगन गिरमळकर, दाऊदी सोनवणे, संगीता भारंबे, कविता परदेशी, अनिता भापसे, सुनील भापसे, त्याच प्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षा पंचशिला सूर्यवंशी, स्मिता कांबळे, हर्षवर्धन सूर्यवंशी, विनोद सूर्यवंशी यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पालकमंत्री पाटील यांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश केला.
अजूनही बरेच पदाधिकारी आणि कार्यकर्ते शिंदे गटात प्रवेश करण्यास इच्छुक आहेत. त्यांचाही प्रवेश टप्याटप्याने केला जाईल, असे जिल्हाप्रमुख भंगाळे यांनी सांगितले. या प्रसंगी जळगाव महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेच्या शिंदे गटाचा प्रभाव सिद्ध करण्यासाठी सर्वांना एकजुटीने पक्षाची ध्येय धोरणे, विकासाचा अजेंडा नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन मंत्री पाटील यांनी केले.
यावेळी शिवसेना महिला आघाडीच्या संपर्क प्रमुख सरिता कोल्हे, माजी नगरसेवक तथा शिंदे गटाचे महानगर प्रमुख कुंदन काळे, युवसेना जिल्हा प्रमुख रोहित कोगटा, गणेश सोनवणे, युवासेना विस्तारक किशोर भोसले, स्वप्नील परदेशी, माजी नगरसेवक दिलीप पोकळे, नवनाथ दारकुंडे, हर्षल मावळे, चेतन सनकत, बाळासाहेब चव्हाण, आशुतोष पाटील ,संतोष मुथा, अमोल मोरे, विकी काळे, सचिन पाटील, शंतनू नारखेडे यांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन सरिता कोल्हे यांनी केले. तर आभार कुंदन काळे आणि गणेश सोनवणे यांनी मानले.
