जळगाव : जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांची प्रकल्प संचालक, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा), मुंबई या महत्त्वाच्या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. तर त्यांच्या जागी करिश्मा नायर यांची जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

मीनल करनवाल या २०१९ बॅचच्या आयएएस अधिकारी असून, त्यांनी जळगाव जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर कार्यरत असताना विविध क्षेत्रांत ठोस आणि परिणामकारक कामगिरी केली. ग्रामीण भागातील आरोग्य सेवा बळकट करणे, शिक्षणाच्या सुविधा सुधारणा, तसेच पाणीपुरवठा व ग्रामविकासाशी संबंधित कामांना त्यांनी विशेष प्राधान्य दिले. त्यांच्या कार्यकाळात जिल्ह्यातील अनेक योजना प्रभावीपणे राबविण्यात आल्या. विशेषतः एचपीव्ही लसीकरण मोहिमेतील जिल्ह्याची राज्यस्तरीय आघाडी, ही त्यांच्या नियोजनशक्ती आणि प्रशासनिक समन्वयाचे उदाहरण मानली जात आहेत.

त्याचबरोबर मिनल करनवाल यांनी प्रशासनात पारदर्शकता आणण्यासाठी डिजिटल प्रणालींचा वापर वाढविला, नागरिकांशी थेट संवाद साधणारे उपक्रम राबवले आणि विविध विभागांमध्ये समन्वय साधत कामकाज अधिक गतिमान केले. त्यांच्या कार्यकाळात जिल्हा परिषदेला राज्यस्तरावर अनेक बाबतीत उल्लेखनीय स्थान मिळाले. आता त्यांची नियुक्ती नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या प्रकल्प संचालकपदी करण्यात आली आहे. आणि हा प्रकल्प राज्यातील दुष्काळग्रस्त भागांसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.

या माध्यमातून शाश्वत शेती, जलसंधारण, मृदसंवर्धन आणि हवामान बदलाशी जुळवून घेणाऱ्या कृषी पद्धतींना चालना दिली जाते. करनवाल यांचा अनुभव या प्रकल्पासाठी महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे मानले जात आहे. दरम्यान, करिश्मा नायर या २०२१ बॅचच्या आयएएस अधिकारी असून, त्या यापूर्वी नाशिक महानगरपालिकेत अतिरिक्त महापालिका आयुक्त म्हणून कार्यरत होत्या. शहरी प्रशासनातील त्यांचा अनुभव आणि कार्यपद्धती लक्षात घेऊन त्यांची जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी महापालिकेत विविध विकासकामे, नागरी सुविधा सुधारणा आणि प्रशासनिक सुधारणा यामध्ये सक्रिय भूमिका बजावली आहे.

करिश्मा नायर यांच्या रूपाने जळगाव जिल्हा परिषदेला नवे नेतृत्व मिळाले आहे. त्यांच्याकडून ग्रामीण विकास, आरोग्य, शिक्षण आणि पायाभूत सुविधांच्या कामांना अधिक वेग मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तसेच मीनल करनवाल यांच्या कार्यकाळात सुरू झालेल्या योजना आणि उपक्रम पुढे अधिक प्रभावीपणे राबविले जातील, असा विश्वास प्रशासन आणि नागरिकांकडून व्यक्त होत आहे.