जळगाव: ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेच्या लाभासाठी महिलांना काही महिन्यांपूर्वी ई-केवायसी प्रक्रिया बंधनकारक करण्यात आली होती. मात्र, ऑनलाइन प्रश्नावलीची उत्तरे चुकीची नोंदवली गेल्याने राज्यातील सुमारे दीड कोटी महिलांचे मागील तीन महिन्यांचे प्रत्येकी १,५०० रुपयांचे हप्ते बँक खात्यात जमा झाले नाहीत. या पार्श्वभूमीवर, आता पुन्हा ई-केवायसी दुरुस्तीची संधी संबंधित सर्व महिलांना देण्यात आली आहे.
‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना दरमहा १,५०० रुपयांची थेट आर्थिक मदत दिली जाते. या योजनेमुळे अनेक कुटुंबांना आधार मिळत असताना, अचानक हप्ते थांबल्याने लाभार्थी महिलांना दैनंदिन खर्च, औषधोपचार व घरगुती गरजांसाठी अडचणींचा सामना करावा लागला आहे. हप्ते न मिळाल्याने गावोगावी महिला लाभार्थींनी तक्रारी केल्या, तर काही ठिकाणी रोष व्यक्त करत आंदोलनाचा इशाराही देण्यात आला. महिलांचा वाढता असंतोष पाहता, महिला व बालविकास विभागाने आता ई-केवायसी दुरूस्तीची ऑनलाइन प्रक्रिया पुन्हा एकदा सुरू केली आहे. विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, यावेळी प्रक्रियेत सुधारणा करून लाभार्थींना दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. त्यासाठी ३१ मार्चची मुदत देण्यात आली आहे.
यापूर्वीच्या ई-केवायसी प्रक्रियेत अनेक तांत्रिक अडचणी समोर आल्या होत्या. ग्रामीण व दुर्गम भागातील अनेक महिलांकडे स्मार्टफोन नसणे, इंटरनेटची सुविधा अपुरी असणे, आधारकार्ड बँक खात्याशी लिंक नसणे, ओटीपी वेळेवर न येणे, तसेच ऑनलाइन फॉर्ममधील तांत्रिक भाषा समजण्यास अडचणी येणे, अशा कारणांमुळे अनेक महिलांची पडताळणी प्रक्रिया अपूर्ण राहिली. काही प्रकरणांत तर चुकीच्या नोंदी झाल्याने पात्र असूनही महिलांना अपात्र ठरविण्यात आले. या पार्श्वभूमीवर, महिला व बालविकास विभागाने महिलांना घाई न करता पुन्हा एकदा ई-केवायसी दुरुस्ती पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे. आवश्यक असल्यास अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक, तसेच सेतू सुविधा केंद्रांची मदत घेण्यास सांगितले आहे. सुधारित प्रक्रियेमुळे थांबलेले हप्ते लवकरच लाभार्थींच्या खात्यात जमा होतील, असा विश्वास विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.
हप्ते कायमस्वरूपी थांबवल्याची भीती
दरम्यान, ई-केवायसी दुरूस्तीची प्रक्रिया पूर्ण करताना घरात कोणी सरकारी कर्मचारी आहे का ? तसेच आपण इतर कोणत्या शासकीय योजनांचा लाभ घेतात का? या प्रश्नांची चुकीची उत्तर दिल्याने अनेक महिलांचा १५०० रूपये हप्ता बंद झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. त्यामुळे आता या महिलांसाठी पुन्हा एकदा ई-केवायसी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. आणि दोनच प्रश्नांची त्यांना उत्तरे द्यावी लागत आहेत. त्यानुसार, अनेक महिलांना ई-केवायसी दुरुस्तीची प्रक्रिया यशस्वी झाल्याचा संदेश लाडकी बहीण योजनेच्या संकेतस्थळावर पाहायला मिळत आहे. मात्र, त्यासोबतच हा आधार क्रमांक ई-केवायसी दुरूस्तीच्या यादीत नाही, असेही संदेश काही महिलांना येत आहेत. असा संदेश आलेल्या महिलांची एकतर यापूर्वी ई-केवायसी यशस्वी झाली असेल, आणि त्यांचे नियमित हप्ते सुरू असावेत. किंवा हप्ते कायमस्वरूपी थांबविण्यात आले असतील, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

