नाशिक: संक्रातीनिमित्त पतंगबाजी करून दोन महिन्यांहून अधिक कालावधी लोटला असला तरी आजही झाडांवर, इमारतींवर संक्रांतीच्या खुणा असलेले पतंग, मांजे लटकत आहेत. यामध्ये अडकलेल्या घारीला पर्यावरणप्रेमींनी जीवनदान दिले.आनंदवल्ली परिसरातील गोदावरी नदीलगत असलेल्या वृक्षावर घार नायलॉन मांजामध्ये गुंतून जीवाची सुटका करण्याचा प्रयत्न करत असल्याचे परिसरातील नागरिकांनी पाहिले. वन्यजीव संरक्षण संस्थेचे भावेश जाधव यांनीही तो प्रकार पाहिला. त्यांनी तात्काळ संस्थेचे अध्यक्ष जयेश पाटील यांना संपर्क साधत त्याबद्दल सविस्तर माहिती दिली. जयेश पाटील आणि प्रशांत कोलते यांनी त्वरित धाव घेत घारीची मांज्यातून सुटका केली. त्यानंतर सादर घारीची तपासणी करून तिला पुन्हा तिच्या अधिवासात मुक्त करण्यात आले.संक्रांत होऊन ५० हून अधिक दिवस झाले असले तरी चायना मांजाचा कहर सुरूच आहे. अनेक पक्षी अजूनही वृक्षांवर आणि इमारतींवर अडकून असलेल्या मांज्यामुळे जखमी होत आहेत. चायना मांजाच्या निर्मिती करणाऱ्या अवैध कारखान्यांचा शोध घेऊन त्यावर कठोर कार्यवाही केली गेली पाहिजे. एकीकडे डोंगर फोड, वृक्षतोड मोठय़ा प्रमाणावर सुरू आहे. शहरात मांज्याचे जाळे पसरलेले आहे.पक्षी सुरक्षित कुठे आहेत, असा प्रश्न उपस्थित होत आहे. एकेकाळी दंडकारण्य असणारे नाशिक आज कुठल्या दिशेला जात आहे ? आता नाशिककरांना एकत्र येऊन आपला वारसा जपावा लागणार आहे, असा सल्ला पर्यावरण मित्र जयेश पाटील यांनी दिला.