नाशिक – भारतीय हवाई दलाने पाकव्याप्त काश्मीर बरोबरच पाकिस्तानात पंजाबमध्ये खोलवर अचूक लक्ष्यभेदी हल्ले करुन आता केवळ दहशतवादी केंद्रच नव्हे तर, त्यांची मुख्यालयेही लक्ष्य ठरतील, असा संदेश दिला आहे. यामुळे तणाव वाढणार असला तरी पाकिस्तानकडून मर्यादित स्वरुपाचा हल्ला केला जाईल. सर्वंंकष युद्ध ते छेडणार नाहीत, असा अंदाज जम्मू-काश्मीरमधील लष्करी मुख्यालयाची जबाबदारी सांभाळणाऱ्या वरिष्ठ निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

लेफ्टनंट जनरल सय्यद अता हसनैन (निवृत्त) यांनी लोकसत्ताकडे पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय सशस्त्र दलांकडून अशी कारवाई अपेक्षित होती, अशी प्रतिक्रिया दिली. पाकिस्तानचा मध्यभाग म्हणजे पश्चिम पंजाबमध्ये हल्ला करण्यात आला. पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानात खोलवर हल्ला करण्याचा संदेश महत्वाचा आहे.

पाकिस्तानकडून तणाव वाढविण्याची शक्यता आहे. परंतु, क्षमतेअभावी ते त्या स्तरावर जातील असे वाटत नाही. काही कालावधीनंतर ते कुरापती काढू शकतात. असे त्यांनी नमूद केले. लेफ्टनंट जनरल डीएस हुडा (निवृत्त) यांनी पहलगामच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानला जो कठोर संदेश देण्याची आवश्यकता होती. तो सिंदूर मोहिमेतून दिला गेल्याचे सांगितले.

यापूर्वीच्या दोन्ही लक्ष्यभेदी हल्ल्यात एखाद्या भागातील दहशतवादी केंद्र लक्ष्य करण्यात आली होती. आता एकाचवेळी नऊ ठिकाणच्या विविध केंद्रांना लक्ष्य करण्यात आले. पूर्वीच्या तुलनेत कितीतरी पटीने हा मोठा हल्ला आहे. महत्वाचे म्हणजे दहशतवादी संघटनांच्या मुख्यालयांनाही सोडले जाणार नसल्याचे अधोरेखीत करण्यात आले. भारताच्या कारवाईंनंतर पाकिस्तान सैन्याकडून मर्यादित स्वरुपाचे हल्ले होतील. सर्वंकष युद्ध ते छेडणार नाहीत, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला.