नाशिक – राज्याचे कृषिमंत्री माणिक कोकाटे यांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कर्ज वसुलीला स्थगिती देण्याची सूचना केल्यानंतरही बँकेकडून सक्तीने वसुलीचे सत्र कायम असल्याची तक्रार करीत सोमवारी शेतकरी समन्वय समितीने सक्तीची वसुली थांबवून कर्जमाफीसाठी श्री काळाराम मंदिरात आंदोलन केले. श्रीरामाच्या नावाने केंद्रात व राज्यात निवडून आलेल्या सरकारला सुबुद्धी द्यावी, असे साकडे घालण्यात आले.
सीतानवमीच्या दिवशी शेतकरी समन्वय समितीचे भगवान बोराडे, ९३८ आदिवासी सहकारी संस्थेचे राज्य अध्यक्ष कैलास बोरसे, धनाजी अहिरे, आदी शेतकरी काळाराम मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ जमले. यावेळी जिल्हा बँकेची सक्तीची कर्ज वसुली बंद करावी, शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावे, अशा घोषणांनी काळाराम मंदिर परिसर दणाणून गेला.
५६ हजार शेतकऱ्यांत़ूस कर्ज वसुलीसाठी जिल्हा बँक सक्तीने वसुली करीत आहे. शेतकऱ्यांच्या सातबारा खाते उताऱ्यावर बँकेसह कार्यकारी सहकारी संस्थेची नावे लावली जात आहेत. अनेक शेतकऱ्यांच्या जमिनीवर नावे लावली गेली असून १५ हजार शेतकऱ्यांची नावे लावण्याची कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे. ही प्रक्रिया तातडीने थांबविण्याची मागणी समितीने निवेदनातून केली.
मुळात ११ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत जिल्हा बँकेच्या कर्ज वसुलीस कृषिमंत्री कोकाटे यांनी स्थगिती दिली होती, तरीही बँकेकडून सक्तीची कर्ज वसुली सुरूच आहे. प्रसारमाध्यमात नावे देणे आणि शेतकऱ्यांच्या जमिनीचे लिलाव करणे, ही प्रक्रिया अजूनही थांबलेली नसल्याकडे पदाधिकाऱ्यांनी लक्ष वेधले.