नाशिक : पिंपळगाव बसवंत येथील प्रमिला लॉन्स येथे प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयातर्फे आयोजित आत्मनिर्भर शेतकरी मेळाव्यात उपस्थित तज्ज्ञांनी फायदेशीर शेती कशी करावी, योगिक आणि सेंद्रिय शेतीचे महत्त्व, शेती पद्धतीतील बदल याविषयी शेतकऱ्यांना माहिती दिली.मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी माउंट आबूवरून राजयोगी ग्राम कृषी आणि ग्राम विकास प्रभागाचे मुख्यालय समन्वयक राजूभाईजी यांची प्रमुख उपस्थिती होती. सोबतच इचलकरंजीचे कृषितज्ज्ञ बाळासाहेब घुगे, कृषी अधिकारी धनंजय वार्डेकर, सह्याद्री फाम्र्सचे विलास शिंदे, विश्वविद्यालयाच्या पुणे उपक्षेत्र संचालिका सुनंदा दीदी, नाशिक उपक्षेत्र मुख्य संचालिका वासंती दीदी, पिंपळगावच्या सरपंच अलका बनकर आदी उपस्थित होते.पाशा पटेल यांनी जगातील १९८ देशांतील ५०० शास्त्रज्ञांनी एकत्र येऊन चार हजार पानांचा अहवाल जागतिक वातावरणीय बदलाविषयी तयार केला असून त्यानुसार २०५० पर्यंत जगातील सागर किनारपट्टीवरील अनेक शहरे, बेट आणि देश पाण्याखाली जाणार असल्याचे म्हटले असल्याकडे लक्ष वेधले. वातावरणातील कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण कमी करणे अतिशय गरजेचे आहे. त्यासाठी बांबू लागवड अतिशय उपयुक्त असल्याचे पटेल यांनी सांगितले.भविष्यातील बांबू लागवड ही अतिशय सोपी विनाखर्चीक आणि अनायास होणारे उत्पादन असून या फायदेशीर शेतीकडे शेतकऱ्यांनी आपले योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. राजूभाई यांनी राजयोगच्या माध्यमातून योगिक शेती कशी केली जाते तसेच ब्रह्माकुमारी संस्थेतर्फे कशा प्रकारे सर्व स्तरांतून लोकांच्या संस्कार परिवर्तनातून नवसमाजाची निर्मिती केली जात आहे, याविषयी विवेचन केले. इचलकरंजीचे प्रयोगशील शेतकरी घुगे यांनी शाश्वत यौगिक आणि विषमुक्त शेती कशी करावी, याविषयी सोदाहरण स्पष्टीकरण केले. योगिक शेतीचा प्रयोग करून आपले आणि समाजाचे असाध्य रोगापासून रक्षण करायला हवे, असे त्यांनी सांगितले.सह्याद्री फाम्र्सचे विलास शिंदे यांनी सेंद्रिय आणि रसायनमुक्त शेती ही भविष्यातील काळाची गरज असून त्या दृष्टीने पावले उचलणे आवश्यक असल्याचे सांगितले. सुनंदा दीदी यांनी ध्यानधारणेद्वारे उपस्थितांना आंतरिक जगाची सफर घडवून आणली. वासंती दीदी यांनी तणावमुक्त जीवन जगण्यासाठी राजयोगाचे महत्त्व मांडले.सूत्रसंचालन पुष्पादीदी आणि पूनमदीदी यांनी केले. आभार कोपरगावच्या सरलादीदी यांनी केले. ओंकार यांनी ईशस्तवन केले. डी फोर डान्स अकॅडमीचे संजय सोनार आणि पथकाने नृत्याद्वारे श्रोत्यांमध्ये देशभक्ती जागृत केली. प्रारंभी प्रभातफेरी काढण्यात आली. प्रभात फेरीचे उद्घाटन सरपंच अलका बनकर यांच्या हस्ते झाले.रिफाइंड तेलात ‘हेक्सिन’कृषितज्ज्ञ वार्डेकर यांनी रिफाइंड तेल आरोग्यासाठी घातक असल्याचे सांगितले. रिफाइंड तेलात हेक्सिन नावाचे एक पेट्रोकेमिकल वापरले जाते. यामुळे शरीरात अनेक आजार निर्माण होतात. हेक्सिन कार्सोजेनिक रसायन असून यातून कर्करोगही होऊ शकतो. त्यामुळे लाकडी आणि लोखंडी घाण्याचे रिफाइंड न केलेले तेल आपल्या शरीराला खूप उपयुक्त आहे. मात्र त्याचा वास येत असल्याने हे तेल जसेच्या तसे घेणे अयोग्य असल्याचा अपप्रचार करण्यात आला, असे त्यांनी नमूद केले.