नाशिक: पाकिस्तानशी वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाने संभाव्य हवाई हल्ल्याबाबत सुरक्षेसाठी सर्व राज्यांना बुधवारी रंगीत तालीम घेण्याचे आदेश दिले होते. या पार्श्वभूमीवर, नागरी संरक्षण दलाचे प्रमुख या नात्याने जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी तयारीचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीस महावितरण, रेल्वे, बीएसएनएल, पोलीस आयुक्तालयासह अन्य विभागांचे अधिकारीच अनुपस्थित राहिले. केंद्र सरकारच्या सूचना गांभिर्याने न घेतल्याने संबंधितांच्या अनुपस्थितीचा अहवाल शासनाकडे पाठविणार असल्याचे जिल्हाधिकारी शर्मा यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्रात १६ प्रमुख शहरांमध्ये संरक्षण सरावाचे नियोजन होते. त्यात जिल्ह्यातील मनमाड, सिन्नरसह नाशिक शहराचा समावेश होता. त्या अनुषंगाने प्रशासन तयारीला लागले. संभाव्य हवाई हल्ल्याबाबतच्या सुरक्षेसाठी रंगीत तालीमचे नियोजन होते. तत्पूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक पार पडली. रंगीत तालीमसाठी सर्व विभागांची तयारी जाणून घेताना अनेक विभागा्चे अधिकारी बैठकीस उपस्थित नसल्याचे दिसले.

पोलीस आयुक्तालयासह सार्वजनिक आरोग्य, रेल्वे, महावितरण, बीएसएनएल या विभागांच्या प्रमुख अधिकाऱ्यांनी बैठकीकडे पाठ फिरवली. याबद्दल जिल्हाधिकारी शर्मा यांनी नाराजी व्यक्त केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
हेही वाचा

संरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या बैठकांना अधिकारी अनुपस्थित राहत असतील तर रंगीत तालीम कशी करणार, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. संबंधित अधिकाऱ्यांच्या बैठक अनुपस्थितीचा अहवाल शासनाला पाठविणार असल्याचे जिल्हाधिकारी शर्मा यांनी सांगितले.