भाजप नगरसेवकाचे महापौर, आयुक्तांना आव्हान आवर्तन सोडल्यामुळे सध्या गोदावरी नदी प्रवाही आहे. तथापि, शहरातील सांडपाणी व कचरा दसक-पंचक परिसरात येऊन साचतो. परिणामी, डासांच्या प्रादुर्भावास रहिवाशांना तोंड द्यावे लागते. जॉगिंग ट्रॅकवर फिरणाऱ्यांची त्यापासून सुटका होत नाही. नदीकाठालगतच्या नांदूर व मानूर परिसरात महापौर व पालिका आयुक्तांनी एकदा एक तास थांबून दाखवावे, असे आव्हान भाजपचे नगरसेवक दिनकर आढाव यांनी देऊन सत्ताधारी भाजपला घरचा आहेर दिला आहे. नाशिक रोडच्या शिवसेनेच्या नगरसेवकांनी वालदेवी नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न सोडविण्यात पालिका दुजाभाव करीत असल्याची तक्रार केली आहे. प्रदूषित पाण्यामुळे नागरिकांना वेगवेगळ्या आजारांना सामोरे जावे लागते. प्रदूषणामुळे उद्भवलेल्या समस्यांवर बोलणाऱ्या प्रत्येक सदस्याचा आग्रह एकच, तो म्हणजे महापौर व पालिका आयुक्तांनी प्रत्यक्ष भेट देऊन स्थितीचे अवलोकन करावे. पालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोदावरी नदीवर नदीच्या पाण्याची गुणवत्ता तपासणी करण्यासाठी यंत्रणा उभारण्याच्या कामाचा विषय ठेवण्यात आला होता. त्या वेळी राष्ट्रवादीचे गजानन शेलार यांनी पाण्याची गुणवत्ता तपासण्याची जबाबदारी पाटबंधारे विभागाची असून ती महापालिका का घेत आहे, असा प्रश्न उपस्थित केला. त्यावर पालिका आयुक्तांनी शहरातून वाहणाऱ्या नदीची काळजी घेणे ही आपली जबाबदारी असल्याचे स्पष्ट केले. या वेळी आढाव यांनी शहरातून मार्गस्थ होणाऱ्या गोदावरीची दसक-पंचक परिसरातील बिकट अवस्था कथन केली. सांडपाणी व कचरा नदीपात्रात साचतो. यामुळे परिसरात नेहमी डासांचा प्रादुर्भाव असतो. सकाळी व सायंकाळी भ्रमंती करणारे भ्रमणध्वनीवरून डासांच्या त्रासाबद्दल तक्रारी करतात. या प्रश्नाचे निराकरण करण्यासाठी तातडीने कारवाई होणे गरजेचे आहे. काठालगतच्या नांदूर व मानूर येथे महापौर व पालिका आयुक्तांनी प्रत्यक्ष पाहणी करून स्थितीचे अवलोकन करावे, असे साकडे त्यांनी घातले. सुदाम डेमसे यांनी पाथर्डी खत प्रकल्पामुळे स्थानिकांसमोर निर्माण झालेल्या समस्या मांडल्या. शहरवासीय पाथर्डीतील प्रकल्पाकडे खत प्रकल्प म्हणून पाहत असले तरी पाथर्डीवासीयांसाठी तो कचरा डेपो आहे. शहरातील सर्व कचरा या भागात आणून टाकला जातो. त्याचे घाण पाणी जमिनीत मुरते. आसपासच्या विहिरींमध्ये ते उतरते. कचरा डेपोमुळे विहिरी प्रदूषित झाल्या असून त्यात मासे जगू शकत नसल्याचे त्यांनी निदर्शनास आणले. पालिकेकडून दुजाभाव सेनेच्या सत्यभामा गाडेकर व सूर्यकांत लवटे यांनी वालदेवीच्या प्रदूषणाचा मुद्दा मांडला. प्रदूषित पाण्यामुळे नागरिकांना विविध आजारांना तोंड द्यावे लागते. गटारी व नाले बंदिस्त करण्याची मागणी करूनही अधिकारी उंच-सखल भाग वा तत्सम कारणे सांगून वेळ मारून नेतात, अशी तक्रार गाडेकर यांनी केली. लवटे यांनी जवळपास ४६ ठिकाणी नाले व गटारीचे पाणी थेट नदीपात्रात सोडले गेल्याचे सांगितले. गोदावरी प्रदूषण मुक्तीसाठी जेवढे प्रयत्न होतात, तसे प्रयत्न वालदेवीच्या प्रदूषणमुक्तीसाठी होत नसून पालिका दुजाभाव करीत असल्याचा आरोप त्यांनी केला. उभयतांनी महापौर व पालिका आयुक्तांनी प्रत्यक्ष भेट देऊन वालदेवीची दुरवस्था पाहावी, अशी मागणी संबंधितांनी केली.