नाशिक : नाशिकच्या पश्चिम घाटात वनक्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. हे वनक्षेत्र वणवे आणि जंगलतोडीमुळे ओसाड होत आहे. इगतपुरी-घोटी, त्र्यंबकेश्वर, पेठ तालुक्यातील उरल्या सुरल्या वनक्षेत्रात वन्य जीवांची तहान भागवण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्चून बांधलेले वनतळे निकृष्ठ कामामुळे कोरडेठाक पडले आहेत. यंदा विक्रमी पाऊस झाला असला तरी ही परिस्थिती आहे. जंगलातील वन्यजीव तहान, भूक भागवण्यासाठी गावात, शहराकडे येऊ लागल्याने वन्यजीव आणि त्यांच्या भयाची चिंता करणाऱ्यांनी आता तरी त्यांच्या जंगलातील असुरक्षिततेबद्दल अधिक सजग व्हावे, असे आवाहन त्र्यंबकेश्वर तालुका जल, जमीन, जंगल वाचवा अभियानाने केले आहे. यंदा विक्रमी पाऊस पडला. नदी, नाले, अजूनही वाहत आहेत. धरणे तुडुंब भरली आहेत. मात्र, नाशिकच्या पश्चिम भागात असणाऱ्या वनक्षेत्रात मात्र वन्य जीवांचे पिण्याच्या पाण्यावाचून हाल होत आहेत. वाघेरा-हरसूल घाट, जव्हार घाट, इगतपुरी-घोटीचे वनक्षेत्र, पेठ तालुक्यातील वनक्षेत्रात वन्य जीवांची घटती संख्या ही मोठी समस्या आहे. वन्यप्राणी,पक्षी यांच्यासाठी असलेले नैसर्गिक पाणवठे, करवंदीच्या जाळ्या, डोंगर कपारीत असलेल्या नैसर्गिक गुहा बहुतांशी नष्ट झाल्या आहेत. या वन्य जीवांची तहान भागवण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्चून केवळ नावाला रोजगार हमीतून यंत्रांचा वापर करून बांधण्यात आलेली वनतळे यंदा विक्रमी पाऊस होऊनही कोरडीठाक झाली असल्याचे वन, पर्यावरणाचे अभ्यासक देवचंद महाले यांनी सांगितले. हेही वाचा - धुळे : कचरा विलगीकरणामुळे प्रदूषणाची समस्या दूर होणार, आयुक्तांकडून घनकचरा प्रकल्पाची पाहणी नाशिकच्या पश्चिम घाटात देवरगाव-रोहिले धुमोडी परिसरातील हरसूल रोड लागत असलेल्या वनक्षेत्रातील पाच वनतळी नेहमीप्रमाणे कोरडी झाली आहेत. कोसीमपाणा (ता.त्र्यंबकेश्वर) वनक्षेत्रातही दोन वनतळी कोरडी झाली असून गणेशगाव (वाघेरा) वनक्षेत्रातील वनतळ्यांची अशीच गत आहे. निसर्ग मानवाला भरपूर देतो. परंतु, माणूस निसर्गाला फार काही देत नाही. भारतीय प्रजातीची झाडे वाढविणे आवश्यक आहे. शिवकार्य गडकोट संवर्धन संस्था, वृक्षवल्ली फाउंडेशन, दरीमाता वृक्षमित्र परिवार, नाशिक पर्यावरणसारख्या संस्था व व्यक्तींनी पर्यावरण क्षेत्रात केलेले काम प्रेरणादायी आहे. आम्ही यापुढे जल जमीन जंगल वाचवा अभियानात नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन होण्यासाठी राबणार आहोत. वन्य जीवांसाठी बांधलेली वनतळी कोरडी असतील तर त्याबद्दल चौकशी व्हावी, असे जल, जमीन, जंगल वाचवा अभियानाचे जयराम बदादे म्हणाले.