नाशिक : चार ते पाच दिवसांपासून अवकाळी पाऊस हजेरी लावत असताना दुसरीकडे उत्तर महाराष्ट्रातील नाशिक आणि जळगाव जिल्ह्यात टंचाईच्या तीव्र स्वरुपात झळा जाणवत आहेत. या दोन्ही जिल्ह्यातील ४४५ गावे आणि वाड्यांना १५१ टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. तीन लाख १२ हजार २४५ नागरिकांची तहान या माध्यमातून भागवली जात आहे. नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यात मात्र टँकरने पाणी देण्याची वेळ अद्याप आलेली नाही.

उन्हाळ्याच्या अखेरच्या टप्प्यात टंचाईग्रस्त गावांची संख्या वाढत आहे. धरणांचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिकमध्ये टंचाईची सर्वाधिक झळ बसली आहे. जिल्ह्यातील १२१ गावे व ३१२ वाड्यांना १२७ टँकरमार्फत पाणी पुरवले जात आहे. गावांची तहान भागविण्यासाठी १५ तर, टँकर भरण्यासाठी ५२ अशा एकूण ६७ विहिरी अधिग्रहित करण्यात आल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. येवला, इगतपुरी, नांदगाव, मालेगाव, चांदवड, कळवण, पेठ, सुरगाणा, बागलाण, देवळा या तालुक्यात टँकर सुरू आहेत. नाशिक जिल्ह्यातील दोन लाख २७ हजार ७७७ लोकसंख्या पिण्याच्या पाण्यासाठी टँकरवर अवलंबून आहे.

जळगावमध्ये तुलनेत बरी स्थिती आहे. या जिल्ह्यातील १२ गावांना १४ टँकरने पाणी पुरवठा होत आहे. गावांची तहान भागविण्यासाठी ३७ तर टँकर भरण्यासाठी नऊ अशा एकूण ४६ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. या जिल्ह्यातील ८४ हजार ४६८ लोक टँकरवर अवलंबून आहेत. धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात कोणत्याही गावात व वाडीत टँकरने पाणी द्यावे लागलेले नाही. या भागात गावाच्या पाणी पुरवठ्यासाठी खासगी विहिरीचे अधिग्रहण झालेले नाही.

११३ विहिरी अधिग्रहित

नाशिक आणि जळगाव जिल्ह्यात टँकर भरण्यासाठी तसेच गावांची तहान भागविण्यासाठी एकूण ११३ खासगी विहिरी अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत. यातील ६७ विहिरी नाशिक जिल्ह्यात तर ४६ विहिरी जळगावमध्ये अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत.