नाशिक : सलग पाच दिवसांपासून जिल्ह्यातील अनेक भागात अवकाळी पाऊस हजेरी लावत आहे. मालेगाव, चांदवडसह आसपासच्या भागात पुन्हा तासभर पाऊस झाला. मंगळवार, बुधवार या दोन दिवसात अवकाळीने जिल्ह्यातील ३३०७ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. नैसर्गिक संकटाची सर्वाधिक झळ आंब्याला बसली. तब्बल १७६३ हेक्टरवरील आंबा, तर ९१६ हेक्टरवरील कांद्याचे नुकसान झाले. जिल्ह्यातील ५२७ गावातील १३ हजार ८२२ शेतकरी बाधित झाल्याचे प्राथमिक अहवालावरून समोर आले.

सलग चार ते पाच दिवसांपासून वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने बहुतांश भागास तडाखा दिला. गुरुवारचा दिवसही त्याला अपवाद ठरला नाही. शहरासह ग्रामीण भागात विजांच्या कडकाटासह अवकाळीने पुन्हा हजेरी लावली. धुळे जिल्ह्याला लागून असलेल्या मालेगाव तालुक्यातील काटवन भागात पावसाचा जोर अधिक होता. कजवाडे, रामपूरा, चिंचवे पोहाणे, विराणे, या गावांना पावसाने झोडपले. तासभर पडलेल्या पावासमुळे शेतांमध्ये पाणी साचले. या पावसाने काढीवर आलेल्या कांद्याचे मोठे नुकसान झाले. चांदवड, वडाळीभोई भागात पाऊस झाल्याचे वृत्त आहे.

आंबा, कांद्याला सर्वाधिक फटका

मंगळवार व बुधवारी झालेल्या अवकाळीचा फटका ५२७ गावातील सुमारे १४ हजार शेतकऱ्यांना बसल्याचे प्राथमिक अहवालावरून निष्पन्न झाले. या भागातील ३३०७ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. यामध्ये निम्मे नुकसान एकट्या आंब्याचे आहे. दोन दिवसांत ९१६ हेक्टरवरील कांद्याचे नुकसान झाले. भाजीपाला २३६ हेक्टर, टोमॅटो ४७, डाळिंब १४०, ८५ हेक्टरवरील कांदारोपवाटिका, गहु तसेच अन्य पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या शिवाय, वादळी वाऱ्यात २९९ घरांची पडझड झाली. पोल्ट्री शेड व जनावरांच्या गोठ्याचेही नुकसान झाले आहे. लहान सात व मोठे एक जनावर दगावले.