पावसामुळे चाळीत साठविलेल्या कांद्याचे ४० ते ५० टक्के नुकसान झाल्यामुळे बाजार समितीत चांगल्या प्रतिच्या मालाची आवक घटली आहे. त्यामुळे कांद्याच्या प्रति क्विंटलच्या दरात आठवडाभरात सुमारे ५०० रुपयांनी वाढ झाली आहे. लासलगाव बाजार समितीत मंगळवारी प्रति क्विंटलला सरासरी २०६० रुपये दर मिळाले. आठ दिवसांपूवी हेच दर १५०० रुपयांच्या आसपास होते. हेही वाचा >>>खासदार ज्येष्ठतेचा अडथळा दूर; डाॅ. भारती पवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा रस्ता सुरक्षा समिती गठीत सलग तीन वर्षे साठविलेल्या उन्हाळ कांद्याला सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये चांगला भाव मिळाला होता. हे वर्ष ऑक्टोबरच्या सुरूवातीपर्यंत त्यास अपवाद ठरले होते. मुबलक उत्पादनामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कांद्याची चाळीत साठवणूक केली होती. चांगला भाव मिळेल या आशेवर राहिलेल्या अनेकांचा भ्रमनिरास झाला. कारण, चार ते पाच महिने कांद्याचे दर हजार ते १३०० रुपयांच्या दरम्यान राहिले. दर वाढत नसताना दुसरीकडे चाळीतील कांद्याचे पावसात नुकसान झाले. प्रदीर्घ काळ पावसाळी वातावरण राहिल्याने साठविलेला कांदा मोठ्या प्रमाणात खराब झाला. नुकसानीचे हे प्रमाण ४० ते ५० टक्के असण्याची शक्यता लासलगाव बाजार समितीचे सचिव सावळीराम वाढवणे यांनी वर्तविली. चांगल्या प्रतीचा कमी माल राहिला असून त्यास चांगला भाव मिळत आहे. मका व सोयाबीनच्या काढणी सुरू आहे. अनेक शेतकरी त्या कामात गर्क आहेत. पाऊसही होत असल्याने ते कांदा विक्रीस नेण्यासाठी उघडीपची प्रतीक्षा करतात. त्यामुळे बाजार समितीत मालाची आवकही बरीच कमी झाली आहे. मंगळवारी साडेआठ हजार क्विंटलची आवक झाली. त्यास कमाल २३८१, किमान ८०० आणि सरासरी २०६० रुपये दर मिळाले. मागील आठवड्यात सरासरी दर दीड हजार रुपयांच्या आसपास होता. या घटनाक्रमाचा दरावर परिणाम होत असल्याचे वाढवणे यांनी नमूद केले. हेही वाचा >>>मनमाड : नवे नाव, निशाणी सर्वांपर्यंत पोहचविण्यासाठी ठाकरे गटाची धडपड नवीन कांदा यंदा काहिसा उशिराने येणार आहे. एरवी त्याची दिवाळीनंतर सुरूवात होते. जुना उन्हाळ कांदा संपत असताना नवीन कांदा येण्यास विलंब झाल्यास मधल्या काळात दर उंचावतात, असा अनुभव आहे. यावर्षी चाळीत किती प्रमाणात चांगला माल शिल्लक आहे, त्यावर पुढील काळात दराचे भवितव्य अवलंबून राहणार आहे. कसमादे भागातील नवीन कांदा पहिल्यांदा बाजारात येईल. नंतर उर्वरित भागातील मालास सुरूवात होईल. परंतु, त्यास अद्याप वेळ लागणार असल्याचे या क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे. तोपर्यंत दर कुठे जातात, याकडे सर्वांचे लक्ष आहे. मनमाडमध्येही किंचित वाढमनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी कांद्याची २६७ ट्रॅक्टर इतकी आवक झाली. प्रथम श्रेणीच्या उन्हाळ कांद्याला कांद्याला १००० ते २०८३, सरासरी १७०० रुपये क्विंंटल तर दुसर्या दर्जाच्या कांद्याला ७०० ते १४००, सरासरी १२०० रुपये असा भाव मिळाला. यापूर्वी १००० ते ११०० रुपये क्विंटल असलेल्या कांद्याच्या भावात थोडीशी का होईना वाढ झाली आहे.