आज सकाळी काही भागांत पाणीपुरवठा बंद टंचाई स्थितीत शहरात आधीच पाणीकपात सुरू असताना शुक्रवारी पहाटे सातपूर येथे जलवाहिनी फुटल्यामुळे प्रभाग क्रमांक २१ आणि ५० मधील नागरिकांना अकस्मात दुहेरी संकटाला तोंड द्यावे लागले. जलवाहिनी फुटल्यामुळे हजारो लिटर पाण्याचा अपव्यय झाला. पहाटेच्या सुमारास हा प्रकार घडल्याने अपव्यय रोखताना पाणीपुरवठा विभागाला धावपळ करावी लागली. आरसीसीमधील या जुनाट जलवाहिनीचे काम तातडीने हाती घेण्यात आले; परंतु उपरोक्त भागात शुक्रवारबरोबर शनिवारीही सकाळी पाणीपुरवठा होणार नसल्याचे महापालिकेने म्हटले आहे. उपरोक्त भागात तातडीने टँकरद्वारे पाणी देण्याची व्यवस्था केली असली तरी नागरिकांचे हाल कायम राहिले. गंगापूर धरणाने तळ गाठल्याने शहरात सध्या दैनंदिन पाणीपुरवठय़ात कपात आणि आठवडय़ातून एकदा पाणीपुरवठा बंद ठेवून बचत केली जात आहे. यामुळे पुरेसे पाणी साठविताना नागरिकांची कसरत होत आहे. या स्थितीत जलवाहिनी फुटण्याचे संकट कोसळल्याने सर्वसामान्यांची अवस्था आणखी बिकट झाली. त्याचा फटका प्रभाग क्रमांक २१ मधील वन विहार कॉलनी, पारिजातनगर, संत कबीर नगर, सातपूर गाव, महादेव वाडी, जेपीनगर, सातपूर-अंबड लिंक रोडचा संपूर्ण परिसर, अष्टविनायक संकुल, आझादनगर, चुंचाळेतील म्हाडा कॉलनी, जाधव संकुल, पाटील पार्क यासह आसपासच्या परिसरांना बसला. पहाटेच्या सुमारास सिमेंट काँक्रीटची ही जलवाहिनी फुटली. त्यामुळे हजारो लिटर पाण्याचा अपव्यय झाला. या घटनेची माहिती समजल्यानंतर पाणीपुरवठा विभागाने तातडीने या वाहिनीतून होणारा पाणीपुरवठा बंद केल्याची माहिती कार्यकारी अभियंता एस. एम. चव्हाणके यांनी दिली. अतिशय जुनी ही जलवाहिनी आहे. पाणीपुरवठा विभागाने स्थितीची पाहणी करत तातडीने दुरुस्तीचे काम सुरू केले. भल्या पहाटे हा प्रकार घडल्याने प्रभाग क्रमांक २१ मधील काही परिसर तसेच प्रभाग क्रमांक ५० मधील पाणीपुरवठा पूर्णपणे विस्कळीत झाला. नेहमीप्रमाणे पाण्याची प्रतीक्षा करणाऱ्या नागरिकांना बराच वेळ होऊनही पाणी का येत नाही, हा प्रश्न पडला. स्थानिक नगरसेवक व पालिका अधिकाऱ्यांशी संपर्क साधल्यावर त्याचा उलगडा झाला. मात्र तोपर्यंत अनेकांच्या घरांतील शिल्लक पाणी संपुष्टात आले होते. जलवाहिनी फुटल्याचा परिणाम विस्तीर्ण भागावर झाल्यामुळे पालिकेने पाच ते सहा टँकर उपलब्ध करत टँकरद्वारे पाणी देण्यासाठी प्रयत्न सुरू केले; तथापि या भागातील लोकसंख्या आणि टँकरची संख्या यात मोठी तफावत असल्याने टँकरचे पाणी सर्वांपर्यंत पोहोचणे अशक्य होते. त्यामुळे बहुतांश नागरिकांचे हाल झाले. जलवाहिनीच्या दुरुस्तीला अधिक कालावधी लागणार आहे. त्यामुळे पाणीपुरवठा तातडीने सुरळीत होण्याची शक्यता मावळली. प्रभाग क्रमांक २१ मधील अनेक भागांत सायंकाळचा पाणीपुरवठा झाला नाही, तर प्रभाग क्रमांक ५० मध्ये शनिवारी सकाळी पाणीपुरवठा होणार नाही. शनिवारी सायंकाळी कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याची माहिती या विभागाचे अधीक्षक अभियंता यू. बी. पवार यांनी दिली.