पाणीचोरी रोखण्यासाठी पोलीस बंदोबस्त मनमाड, येवलासह रेल्वेसाठी बुधवारी पालखेड धरणातून पोलीस बंदोबस्तात आवर्तन सोडण्यात येणार आहे. पाणीचोरी होऊ नये म्हणून मार्गातील वीजपुरवठाही खंडित ठेवण्याची तयारी करण्यात आली आहे. पालखेड धरण समूहात ७५० दशलक्ष घनफूट पाणी सोडण्यात येणार आहे. यामुळे पुढील काळात मनमाड शहराला किमान १३ ते १४ दिवसांआड पाणीपुरवठा होणार आहे. मनमाड शहरास पाणीपुरवठा करणारे वाघदर्डी धरण सप्टेंबरमध्ये २०१६ मध्ये तुडुंब झाले होते. पुढील काळात पाणी वितरण, दररोज होणारा वापर तसेच बाष्पीभवन यामुळे धरणातील जलसाठा दिवसागणिक कमी होत गेला. पाटोदा येथे असलेल्या साठवणूक तळाची हीच स्थिती आहे. पुढील दहा दिवस मिळणाऱ्या आवर्तनाच्या पाण्यावर पुढील किमान ४५ दिवस मनमाड व येवलेकरांना तहान भागवावी लागणार आहे. मनमाड रेल्वे तसेच येवल्यासह ३८ गाव पाणीपुरवठा योजनेवर अवलंबून असलेल्या गावांसाठी पालखेड धरणातून आवर्तन सोडण्यात येणार आहे. वहन मार्गावर पाणीचोरी होऊ नये, यासाठी फौजदारी कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी यंत्रणांना दिले आहेत. त्यानुसार पोलीस बंदोबस्तात जेसीबी लावून डोंगळे काढणे सुरु झाले आहे. तशी धडक कारवाई करण्यात आल्याने कालव्याच्या दुतर्फा असलेल्या शेतजमिनीच्या मालकांवर पाणीचोरीचा गुन्हा दाखल होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. पालखेडमधून सोडण्यात येणारे आवर्तन हे केवळ पिण्याच्या पाण्याचे आहे. ते सिंचनासाठी अडविले जाऊ नये, याची काळजी घेतली जाणार आहे. पाणी सोडल्यानंतर वहन मार्गावरील वीजपुरवठाही खंडित केला जाणार आहे. तसेच प्रत्येक पाच किलोमीटरवर कार्यकारी अभियंता, पोलीस कर्मचारी, वीज कंपनीचे कर्मचारी यांचे पथक कार्यरत राहील. गतवर्षीच्या तुलनेत यंदा चांगली स्थिती आहे. गेल्या वर्षी या काळात म्हणजे एप्रिल व मेमध्ये मनमाड शहराला २५ ते ३० दिवसांआड पाणीपुरवठा सुरू होता. सध्या तो १३ ते १४ दिवसांआड सुरू आहे. या आवर्तनामुळे सध्याच्या वितरण व्यवस्थेत जून अखेपर्यंत हे पाणी पुरू शकते, परंतु पाऊस लांबणीवर पडला तर पाण्याच्या नियोजनाचे गणित विस्कटण्याची शक्यता बळावते. आठ वर्षांनंतर वाघदर्डी धरण प्रथमच भरले होते. त्यामुळे जानेवारीअखेपर्यंत शहराला दहा दिवसाआड पाणीपुरवठा शक्य झाला. एप्रिलमध्ये हा कालावधी १३ ते १४ दिवसाआडवर पोहोचला. त्यास गळती हेदेखील कारण आहे. उपलब्ध साठय़ातून किमान ११ ते १३ दिवसांआड जूनअखेपर्यंत वितरण व्यवस्थेत पुरविता येईल, असे मुख्याधिकारी डॉ. दिलीप मेनकर यांनी सांगितले.