उद्योग, वाहतूक, रस्त्यावरील धुळ, वीटभट्ट्या, बांधकाम, स्टोन क्रशर, स्मशानभूमी, बेकरी अशा जवळपास ११ क्षेत्रांमधून होणाऱ्या उत्सर्जनामुळे शहर आणि ग्रामीण भागात हवेतील प्रदूषण वाढण्यास हातभार लागल्याचे राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था (निरी), ऊर्जा व संसाधन संस्था (टेरी) आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (एमपीसीबी) यांच्या सहकार्याने केलेल्या अभ्यासातून उघड झाले आहे. कधीकाळी स्वच्छ हवेसाठी ओळखल्या जाणाऱ्या नाशिकची ही ओळख धुलीकणांसह अन्य वायुंमुळे अडचणीत येण्याच्या मार्गावर आहे. स्थानिक यंत्रणांनी उपरोक्त घटकांच्या सोबतीने धुलीकण आणि धोकादायक वायू उत्सर्जन कमी करण्यासाठी प्रभावीपणे काम केल्यास नाशिकच्या हवेची गुणवत्ता उंचावता येईल, याकडे तज्ज्ञांनी लक्ष वेधले. हेही वाचा- सप्तश्रृंगीदेवी मंदिराचे लवकरच नुतनीकरण, गडावरील ग्रामस्थ, कर्मचाऱ्यांना आरोग्य सुरक्षा कवच केंद्राच्या राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमात (एनसीएपी) अंतर्गत येणारा नाशिक हा देशातील एक जिल्हा आहे. निरी आणि टेरी संस्थेने नाशिकच्या हवेच्या गुणवत्तेचा अभ्यास केला. त्याचे निष्कर्ष बुधवारी उपरोक्त संस्था, महानगरपालिका आणि स्विस एजन्सी फॉर डेव्हलपमेंट ॲण्ड कोऑपरेशन (एसडीसी) यांच्यावतीने वायू प्रदूषणाचा सामना करण्यासाठी प्रसारमाध्यमांचे सहकार्य या विषयावरील कार्यशाळेत मांडले गेले. याप्रसंगी मनपा आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, टेरीचे शास्त्रज्ञ आर. सुरेश, निरीचे शास्त्रज्ञ राहुल व्यवहारे हे प्रत्यक्ष तर ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशनचे महाव्यवस्थापक डॉ. मोक्तिक बवासे हे दृकश्राव्य माध्यमातून सहभागी झाले. अभ्यासात प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या गुणवत्ता मापन यंत्रणांनी संकलित केलेल्या माहितीचा वापर केला गेला. निष्कर्षातील विविध मुद्यांवर चर्चा करून शास्त्रज्ञांनी प्रदूषण कमी करण्यासाठी पर्याय सुचविले. हवेतील प्रदूषण मानवी आरोग्यासाठी धोकादायक आहे. हवेत धूळ, माती, धातू वा तत्सम सुक्ष्म व अतिसुक्ष्म कण मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे धुके दाटल्याचा भास होऊन दृश्यमानता कमी होते. अतिसुक्ष्म कण श्वसनातून मानवी शरिरात जाऊ शकतात. सुक्ष्म व अतिसुक्ष्म धुलीकण, इंधन वापरातून उत्सर्जित होणारे वायू यांचे मापन करून प्रदूषण वाढविण्यास कारक ठरलेले ११ घटक शोधण्यात आले. हेही वाचा- चांदवड : राहुड घाटात धावत्या एसटी बसने घेतला पेट, चालकाच्या सतर्कतेमुळे ३५ प्रवाश्यांचे वाचले प्राण उद्योग, वाहतुकीमुळे सर्वाधिक धुलीकण प्रदूषणात धुलीकण उत्सर्जनात जिल्ह्यात उद्योगांचा मोठा वाटा (४० टक्के) असून त्यानंतर वाहतूक क्षेत्राचा (३० टक्के) क्रमांक लागतो. अतिसुक्ष्म धुलीकणात वाहतूक (४५ टक्के) तर उद्योगाचे (२८ टक्के) योगदान आहे. शहरातील वाहतूक, रस्त्यावरील धूळ-माती, बेकरी व घरात लाकूड, कचरा वा तत्सम पदार्थ जाळणे आदी घटकांनी हवेत धुलीकण उत्सर्जित होत आहेत. शहर व ग्रामीण भागात वाहनांमुळे हवेत नायट्रोजन ऑक्साईड्स (एनओएक्स) वायू मिसळतो. त्यात वाहतूक क्षेत्राचे जिल्ह्यात ९३ तर शहरात ८२ टक्के योगदान असल्याचे अभ्यासात उघड झाले. उद्योग क्षेत्राचे हे प्रमाण १६ टक्के इतके आहे. जिल्ह्याचा विचार करता वीट भटट्यांमुळे तीन टक्के, स्टोन क्रशरमुळे एक, बांधकामांमुळे चार, रस्त्यावरील धूळ, मातीमुळे आठ टक्के सुक्ष्म व अतिसुक्ष्ण धुलीकण पसरतात. शहरात सुक्ष्म व अतिसुक्ष्ण धुलीकण पसरण्यात वाहतूक क्षेत्राचे ३० टक्के, रस्त्यावरील धुळ, माती २४ टक्के, बेकरी २२ टक्के, हॉटेल व रेस्टॉरंट दोन टक्के, उद्योग आठ टक्के योगदान असल्याचे निष्पन्न झाले आहे. हेही वाचा- सिडको, सातपूर, मुंबई नाका, कोणार्कनगर प्रमुख ठिकाणे शहरातील सिडको, सातपूर गाव, मुंबई नाका, आणि कोणार्कनगर ही सुक्ष्म धुलीकणाची प्रमुख ठिकाणे ठरली आहेत. शहरात मुख्यत्वे लोकसंख्येची घनता, बांधकाम आणि वाहनांची घनता यामुळे धुलीकरणांचे उत्सर्जन होते. शहरात वाहनांमधून बाहेर पडणारा धूर व औद्योगिक क्षेत्रातील प्रक्रिया यामुळे नायट्रोजन ऑक्साईड्सचे उत्सर्जन होत आहे. महामार्गांवरही वेगळी स्थिती नाही. ग्रामीण भागात कच्चे रस्ते, वाहनांची वाढती संख्या, स्वयंपाकासाठी वापरले जाणारे लाकूड व तत्सम इंधनाचा ज्वलन आदींमुळे धुलीकरणांची तीव्रता वाढते. हेही वाचा- चांदवड : राहुड घाटात धावत्या एसटी बसने घेतला पेट, चालकाच्या सतर्कतेमुळे ३५ प्रवाश्यांचे वाचले प्राण मनपाची तयारी काय ? हवेतील वाढते प्रदूषण लक्षात घेऊन महानगरपालिकेने गांभिर्याने पावले उचलल्याकडे मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी लक्ष वेधले. शहरातील बहुतांश बस हरित इंधनावर चालतात. स्मशानभूमीत वीज दाहिन्यांची संख्या वाढविली जात आहे. इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी मनपा १०० हून अधिक ईव्ही चार्जिंग केंद्राची स्थापना करणार आहे. यांत्रिक पध्दतीने रस्ते सफाई करणारी वाहने आदी योजना आखल्याचे त्यांनी नमूद केले.