राष्ट्रसेविका समितीच्या उपक्रमास १९०० महिलांचा प्रतिसाद भाऊ-बहिणीच्या नात्यामधील अतूट प्रेमाचे प्रतीक असलेले रक्षाबंधन अवघ्या काही दिवसांवर आले असताना राष्ट्रसेविका समितीने या सणाला वेगळा आयाम देण्याचा प्रयत्न केला आहे. देशाच्या सीमेवर संरक्षणासाठी तैनात असणाऱ्या सैनिकांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ‘एक राखी सैनिकांसाठी’ हा अनोखा उपक्रम हाती घेतला. या उपक्रमाचे वैशिष्टय़ म्हणजे सैनिकांविषयी आपणास नेमके काय वाटते हे चार ओळीत शब्दबद्ध करण्याचे आवाहन करण्यात आले होते. जिल्ह्यातील १९०० महिलांनी या उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. आपल्याकडे देशभक्ती उफाळून येण्यासाठी राष्ट्रीय सण पुरेसे ठरतात. मात्र त्या दोन दिवसाच्या पलीकडे देशासाठी अहोरात्र झटणाऱ्या सैनिकांविषयी कृतज्ञता भाव व्यक्त करता यावा, यासाठी राष्ट्रसेविका समिती ११९९ च्या कारगील युद्धापासून ‘एक राखी सैनिकांसाठी’ हा उपक्रम राबवत आहे. पहिल्या दोन वर्षांत असलेला नागरिकांचा उत्साह नंतर मावळला. इतका की घरी जाऊन राख्या संकलित करायच्या म्हटल्या तरी लोक पैसे देत त्यांची बोळवण करायचे. यंदा मात्र या उपक्रमाचे स्वरूप बदलण्याचे ठरवले. कमांडट विनायक आगाशे (निवृत्त) यांच्या सहकार्याने मुंबई व विशाखापट्टणम येथील नौदल तसेच लष्करातील जवानांसाठी राष्ट्रसेविका समितीने राख्याचे दोन ते तीन खोके पाठविले. एका पाणबुडीवर ७५ अधिकारी-कर्मचारी या प्रमाणे त्याची विभागणी होणार असल्याची माहिती प्रकल्प समन्वयक प्रा. सुनीता पिंपळे यांनी दिली. यंदा या उपक्रमात चार वर्षांच्या चिमुरडीपासून ते ८७ वर्षांच्या आजीपर्यंतच्या महिलांनी सहभाग नोंदविला आहे. कुटुंबापासून दूर राहत देशसेवा करणाऱ्या अनामिक सैनिकांना सलाम करण्यासाठी माझी राखी.. असे सांगत सैनिकहो, तुम्ही आता अनाम नसून आमच्या कुटुंबाचा एक भाग आहात अशा शब्दात महिला वर्गाने आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. चिमुकल्यांच्या भावना पूर्व प्राथमिक गटातील बालकांना चार ओळी लिहिता येत नसल्याने त्यांनी आपल्या भावना तिरंगा, सैनिक, अमर ज्योत अशा चित्रातून व्यक्त केल्या. तर प्राथमिक व माध्यमिकच्या मुलींनी वेगळा विचार मांडण्याचा प्रयत्न केला. एक चिमुरडी म्हणते, मला भाऊ नसल्याने दरवर्षी राखी कोणाला पाठवायची हा प्रश्न होता. पण शाळेतल्या ताईने सांगितले, देशाचे रक्षण करणारे सैनिक आपले बांधव आहेत. मला भाऊ मिळाला आता मी त्यालाच दरवर्षी राखी पाठवणार असल्याचे पत्रात सांगितले. काही चिमुकल्यांनी सैनिक भावासाठी शुभेच्छा पत्रेही तयार केली. शिंदवाडीच्या आदिवासी वस्तीतील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी घेतलेला सहभाग या उपक्रमाचे यश अधोरेखित करतो.