जो समाजभिमुख काम करतो तो नक्कीच राजकारणात मोठा होतो. ग्रामीण भागातील महिलांच्या डोक्यावरील हंडा खाली उतरवून घराजवळ त्यांना पाणी उपलब्ध करून देण्याचे आपले स्वप्न आहे, असे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केले.
येथील शिवाजीनगर व ध्रुवनगर परिसरात विविध विकास कामांच्या आणि गोपीनाथ मुंडे जलकुंभ लोकार्पण सोहळ्याप्रसंगी त्या बोलत होत्या. आपणास नाशिककरांकडून खूप प्रेम मिळत आहे. आमचे आणि नाशिकचे नाते जिव्हाळ्याचे आणि जवळचे झाले आहे, असेही त्यांनी नमूद केले. प्रास्ताविक नगरसेवक दिनकर पाटील यांनी केले. हा उद्घाटन सोहळा राजकारणासाठी नसून सर्वाना एकत्र आणण्यासाठी आयोजित करण्यात आल्याचेही पाटील यांनी सांगितले. कार्यक्रमाप्रसंगी मार्शल आर्टमध्ये विशेष कामगिरी करणाऱ्या आकांक्षा आव्हाड या बालिकेला मुंडे यांच्या हस्ते गौरविण्यात आले. अमोल पाटील, उमेश जाधव यांचाही सत्कार मुंडे आणि मेहता यांच्या हस्ते करण्यात आला. सूत्रसंचालन श्याम पाडेकर यांनी केले