करोनाचा प्रसार कमी असण्याच्या कारणांचा शोध नाशिक: सर्वत्र ओमायक्रॉनचे रुग्ण वाढत असतांना मालेगांव येथे रुग्णांचे प्रमाण अत्यल्प आहे. या संदर्भात शास्त्रीय कारणमीमांसा करण्यासाठी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने संलग्नित चार वैद्यकीय महाविद्यालयातील शिक्षक, विद्यार्थी आणि अभ्यागत यांचे पथक नेमले आहे. त्यांच्यामार्फत १५ दिवस सर्वेक्षण करण्यात येणार आहे. मालेगावातील आश्चर्यकारक स्थितीबाबत शास्त्रीय संशोधन होणे गरजेचे असल्याचे मत आरोग्य विद्यापीठाच्या कुलगुरू लेफ्टनन्ट जनरल (निवृत्त) डॉ. माधुरी कानिटकर यांनी व्यक्त केले आहे. जिल्ह्यात दिवसागणिक करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. मंगळवारची आकडेवारी पाहिल्यास एकाच दिवसात जिल्ह्यात १४५० नव्या रुग्णांची भर पडली. यात नाशिक शहरात सर्वाधिक १०३८, ग्रामीण भागातील ३५०, मालेगाव मनपा क्षेत्रातील १४ आणि जिल्हाबाह्य ४८ जणांचा समावेश आहे. नाशिक शहर आणि ग्रामीण भागाच्या तुलनेत मालेगाव मनपा क्षेत्रात ओमायक्रॉनचा प्रभाव अतिशय कमी आहे. या अनुषंगाने मालेगाव येथे जिल्हाधिकारी सूरज मांढरे, कुलगुरू डॉ. कानिटकर, मालेगावच्या महापौर ताहेरा शेख, मालेगाव मनपाचे अधिकारी यांची बैठक होऊन चर्चा झाली. या संशोधनाची जबाबदारी आरोग्य विभागाने स्वीकारली आहे. या सर्वेक्षणात संगणकीकृत पध्दतीने रक्ताचे नमुने घेऊन तपासणी करण्यात येणार आहे. यासाठी प्रश्नावली तयार करण्यात आली असून सर्व माहितीचे निष्कर्ष काढल्यानंतर ते शासनाकडे सादर केले जातील, असे डॉ कानिटकर यांनी सांगितले. विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण यांनी करोनासंदर्भातील विद्यापीठाचा संशोधनात्मक उपक्रम असून यासाठी स्थानिक नागरिकांनी सहकार्य करणे गरजचे असल्याचे मांडले. या संशोधन अभ्यासासाठी आरोग्य विभागाने परवानगी दिली आहे. यासाठी आयुष मंत्रालयांतर्गत येणारे युनानी, होमिओपॅथी, आयुर्वेद , अॅलोपॅथी डॉक्टरांची मदत घेतली जाणार आहे. या उपक्रमात विद्यापीठाचे मालेगाव आणि धुळे येथील विविध विद्याशाखांचे संलग्नित महाविद्यालयातील विद्यार्थी तसेच शिक्षक सहभागी होणार असल्याचे त्यांनी सांगितले.