नाशिक – जम्मू काश्मिरच्या वेगवेगळ्या भागात नाशिक जिल्ह्यातील सुमारे ६० पर्यटक थांबले असून ते सर्व सुखरूप असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. पहेलगाममध्ये अडकलेले चार प्रवासी बुधवारी विमानाने मुंबईकडे मार्गस्थ झाल्याचे यात्रा कंपनीकडून सांगण्यात आले. श्रीनगरमध्ये बुधवारी दुकाने बंद असली तरी स्थिती सामान्य होती.

नवीन पर्यटकही मोठ्या प्रमाणात येत असल्याचे आश्वासक चित्र पहायला मिळाल्याचे थांबलेल्या प्रवाशांकडून सांगण्यात आले. पहेलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर प्रशासनाने अडकलेल्या पर्यटकांची माहिती संकलित करण्यास सुरुवात केली. पर्यटन कंपन्यांच्या माध्यमातून सहलीला गेलेले ५० तर वैयक्तिकरित्या सहलीचे नियोजन करून गेलेले १० असे एकूण ६० नाशिककर जम्मू काश्मिरमध्ये असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

पाच नाशिकचे पर्यटक पहेलगाम, १२ गुलमर्ग येथे तर उर्वरित पर्यटक श्रीनगरमध्ये आहेत. यातील एक स्मिता गवई यांनी बुधवारी श्रीनगरमध्ये टेम्पोतून मोठ्या संख्येने पर्यटक आल्याचे आश्वासक चित्र पहायला मिळाल्याचे सांगितले. या दिवशी श्रीनगरमधील दुकाने बंद होती. परंतु, हॉटेल सुरू होती. पर्यटकांची आसपासच्या परिसरात भ्रमंती सुरू होती. सामान्य वातावरण होते.

वृत्तवाहिन्यांवर जे चित्र रंगवले जाते, तशी स्थिती नसल्याचे गवई यांनी आवर्जून नमूद केले. दरम्यान, पहेलगाम येथे अडकलेले नाशिकचे चार प्रवासी या भागातून सुखरूपपणे बाहेर पडले. बुधवारी ते विमानाने मुंबईकडे निघाल्याचे चौधरी यात्रा कंपनीचे प्रमुख ब्रिजमोहन चौधरी यांनी सांगितले.