scorecardresearch

“आपण बाळासाहेबांच्या काँग्रेसचे काम करायचे, की नानांच्या काँग्रेसचे?”, पक्ष प्रवक्त्याचं ट्वीट चर्चेत

नाशिक पदवीधर मतदारसंघातील उमेदवारीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि काँग्रेसचे विधीमंडळ नेते बाळासाहेब थोरात यांच्यात संघर्ष पाहायला मिळत आहे.

Balasaheb Thorat Nana Patole Hemlata Patil tweet
बाळासाहेब थोरात, नाना पटोले (लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

नाशिक पदवीधर मतदारसंघातील उमेदवारीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि काँग्रेसचे विधीमंडळ नेते बाळासाहेब थोरात यांच्यात संघर्ष पाहायला मिळत आहे. आधी ही केवळ तांबे कुटुंबाची बंडखोरी मानली जात होती. या काळात बाळासाहेब थोरात यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया आली नव्हती. मात्र, आता थोरात यांनीही सत्यजीत तांबेंची बाजू घेत राजकारण झाल्याचा आरोप केला. यानंतर आता महाराष्ट्र काँग्रेसचे कार्यकर्ते संभ्रमात पडलेले दिसत आहेत. याचीच प्रचिती करणारं ट्वीट काँग्रेसच्या सरचिटणी, प्रवक्त्या आणि नाशिकच्या नगरसेविका हेमलात पाटील यांनी केलं आहे.

हेमलता पाटील म्हणाल्या, “आज सकाळी सकाळी फोन आला, ‘ताई आपण बाळासाहेबांच्या कॉंग्रेसचे काम करायचे, की नानांच्या कॉंग्रेसचे?’ आता काय उत्तर देऊ कप्पाळ?”

हेमलात पाटील यांच्या या ट्वीटनंतर पुन्हा एकदा महाराष्ट्र काँग्रेसमधील दुफळी समोर आली आहे. या ट्वीटवर प्रतिक्रिया देणाऱ्यांपैकी कुणी म्हटलं भाजपाबरोबर असणाऱ्यांचं काम करू नका, कुणी म्हटलं नाना पटोलेंच्या काँग्रेसचं काम करा, कुणी म्हटलं काँग्रेसचं काम करा, तर कुणी म्हटलं हे सर्व नाट्य थांबवा, काहीतरी मार्ग निघेल.

हेही वाचा : महिन्यापेक्षा अधिक काळ रुग्णालयात का? नेमकं काय झालंय? बाळासाहेब थोरातांनीच सांगितलं कारण, म्हणाले…

काय म्हणाले बाळासाहेब थोरात?

दरम्यान, काँग्रेसमधील बंडखोरीवर बाळासाहेब थोरात म्हणाले, “विधान परिषदेच्या निवडणुकीवेळी मोठं राजकारण झालं. सत्यजीत तांबे या निवडणुकीत चांगल्या मतांनी विजयी झाले. मी त्यांचं अभिनंदन करतो. मात्र, जे राजकारण झालं, ते व्यस्थित करणारं होतं. मी याबाबत माझी भूमिका पक्षश्रेष्ठींकडे मांडली आहे. हे पक्षीय राजकारण आहे. त्यामुळे यावर बाहेर बोललं पाहिजे.”

“या मताचा मी नाही. याबाबत पक्षातील नेत्यांबाबत बोलणं झालं असून योग्य तो निर्णय होईल. तसेच गेल्या काही दिवसांत काही लोकांना आपल्याबद्दल गैरसमज पसवण्याचं काम केलं. मात्र, काँग्रेसचा विचार हा आपला विचार आहे आणि आपली पुढेची वाटचालही याच विचाराने होणार आहे,” असंही थोरातांनी नमूद केलं.

हेही वाचा – “राष्ट्रहिताकरिता साहित्यिकांनी प्रखरपणे विचार मांडावे”, साहित्य संमेलनात नितीन गडकरींनी व्यक्त केलं मत; म्हणाले, “देशाची लोकशाही…”

“महाराष्ट्रातील सत्तांतरानंतर मोठ्या प्रमाणात राजकारण होतं आहे. अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांना त्रास दिला जात आहे. त्यांना अडचणीत आणलं जात आहे. त्यांचे उद्योग बंद पाडण्यासाठी अनेकांकडून प्रयत्न सुरू आहे. मात्र, आपण अनेकदा संघर्ष केला आहे. संघर्षातूनच आपण मोठं झालो आहे. त्यामुळे या संघर्षातून आपण नक्कीच बाहेर येऊ, असा मला विश्वास आहे,” असेही ते म्हणाले.

मराठीतील सर्व नाशिक / उत्तर महाराष्ट्र ( Nashik ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-02-2023 at 17:50 IST
ताज्या बातम्या