लोकसत्ता वृत्तविभाग येवला: परीक्षेत इच्छित ध्येय गाठण्यासाठी असलेले दडपण आणि अभ्यासाच्या ताणामुळे नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यात दोन विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याचे उघड झाले. विद्यार्थ्यांकडून पालकांच्या अपेक्षा वाढल्या असताना वाढत्या स्पर्धेचाही दबाव विद्यार्थ्यांवर येत असतो. त्यातच परीक्षा जवळ आल्यावर अभ्यासाचा अधिक ताण विद्यार्थ्यांवर येत असतो. हा ताण विद्यार्थ्यांच्या जीवावर उठू लागला आहे. येवला तालुक्यातील दोन विद्यार्थ्यांनी केलेल्या आत्महत्या त्यामुळेच चर्चेचा विषय झाला आहे. आणखी वाचा- नाशिक : सौदा पावतीशिवाय शेतकऱ्यांनी व्यवहार करु नये, पोलीस महानिरीक्षक बी. जी. शेखर यांचे आवाहन नीट परीक्षेची तयारी करणाऱ्या तालुक्यातील चिचोंडी येथील सौरभ गायकवाड (१८) या विद्यार्थ्याने रविवारी सकाळी सहाच्या सुमारास गळफास घेतल्यानंतर तासाभराच्या अंतराने तालुक्यातील डोंगरगाव येथील सौरभ सोमासे या विद्यार्थ्याने इयत्ता १० वीचा इंग्रजीचा पेपर अवघड गेल्याने गळफास घेतला. ऐन रंगपंचमीच्या सणाच्या दिवशी या विद्यार्थ्यांच्या आत्महत्येमुळे त्यांचे नातेवाईक अस्वस्थ झाले आहेत.