नाशिक: युक्रेनमध्ये कर्नाटकातील विद्यार्थ्यांच्या मृत्युसंदर्भाने अडकलेल्या विद्यार्थ्यांना भारतात आणण्यास उशीर झाला काय, असा प्रश्न येथे आयोजित पत्रकार परिषदेत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना विचारण्यात आला असता ते भडकले. संजय राऊतांनी प्रश्न विचारायला सांगितले काय, अशा शब्दात त्यांनी संताप व्यक्त केला. युक्रेनमधील भारतीय विद्यार्थ्यांना देशात आणण्यासाठी पंतप्रधानांनी चार मंत्र्यांवर जबाबदारी सोपविली आहे. विद्यार्थ्यांना सुखरूप मायदेशी आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ज्या विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला, त्याच्या कुटुंबीयांपर्यंत मदत पोहोचवली जाईल, असे राणे यांनी सांगितले. मंगळवारी राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत महानगरपालिकेच्या वतीने आयोजित आयटी परिषद पार पडली. त्यानंतर राणे यांनी शिवसेना नेत्यांवर टीका केली. दिशा सालियान प्रकरणात सत्य समोर आल्यास शिवसेनेचा मोठा नेता कारागृहात जाईल. त्यामुळे प्रकरण फिरवण्यासाठी अधिकाऱ्यांवर दबाव आणला जात आहे, असा आरोप त्यांनी केला. दिशाला न्याय मिळावा यासाठी आम्ही प्रयत्न करीत असून तिच्या कुटुंबीयांनी आमचे आभार मानायला हवेत, असेही ते म्हणाले. सेनेच्या भ्रष्टाचाराची चोपडी आमच्याकडे आहे. संजय राऊत यांनी राज्यातील तपास यंत्रणांना भाजपच्या नेत्यांची यादी दिल्यास आम्ही सेनेच्या नेत्यांची यादी केंद्रीय यंत्रणांना देऊ, असा इशारा त्यांनी दिला.