नाशिक - ज्ञानाला तंत्रज्ञानाची जोड देऊन संरक्षण दलात नवनवीन संशोधन करण्यात येत आहे. यामुळे संरक्षण क्षेत्रात तयार करण्यात येणाऱ्या साधन सामग्रीच्या निर्यातीतून देशात नवीन रोजगार निर्मितीला चालना मिळत आहे. देवळाली कॅम्प आणि नाशिक येथे संरक्षण क्षेत्रातील मोठी व्यवस्था आहे, या पार्श्वभूमीवर येथे रोजगार निर्मितीसाठी अनेक संधी उपलब्ध असून नाशिक संरक्षण केंद्र व्हावे यासाठी प्रयत्न करण्यात येईल, असे आश्वासन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिले. हेही वाचा >>>नंदुरबार : १७ तासानंतरही शेतीच्या बांधांवर गारांचा खच -संपामुळे पंचनाम्यांविषयी सा शंकता येथील ईदगाह मैदानात आयोजित करण्यात आलेल्या आपल्या सैन्याला ओळखा (नाऊ युवर आर्मी) या दोन दिवसीय प्रदर्शनाचे उद्घाटन गडकरी यांच्या हस्ते झाले. यावेळी मार्गदर्शन करताना गडकरी यांनी देशाच्या संरक्षणाची ताकद वाढविण्यात भूदल, नौदल, हवाईदल या तिन्ही दलांचा मोठा वाटा असल्याचे सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मेक इन इंडिया आणि मेड इन इंडियाची सुरुवात झाली आहे. त्यातूनच संरक्षण दलातील विविध साधन सामग्री व संरक्षण साहित्य हे आपल्याच देशात तयार होत असून संरक्षण सामग्री निर्यात करणारा देश म्हणून भारताची ओळख होत आहे. ही आपल्या सर्वांसाठीच अभिमानाची गोष्ट आहे. नवतंत्रज्ञानाच्या आधारे आपल्या देशात निर्मिती करण्यात येणारी संरक्षण दलातील साधन सामग्री, सैन्यात दिले जाणारे प्रशिक्षण या माध्यमातूनच देशाचे संरक्षण कसे केले जाते. या सर्व गोष्टींची माहिती सर्वसामान्यांना, नवयुवकांना होण्यासाठी या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनात बोफोर्स तोफसह भारताने अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने बनवलेली धनुष ही तोफ देखील ठेवण्यात आली आहे. या प्रदर्शनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना व तरुणांना सैन्यात भरती होण्यासाठी नक्कीच प्रेरणा मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. स्कूल ऑफ आर्टीलरीचे कमांडन्ट लेफ्टनंट जनरल एस. हरिमोहन अय्यर यांनी यावेळी नाशिकमध्ये पहिल्यांदाच असे प्रदर्शन भरविण्यात आले असून नाशिककरांचा प्रदर्शनास प्रतिसाद लाभल्याचे सांगितले. या कार्यक्रमास केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, खा. हेमंत गोडसे, राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री दादाजी भुसे, आ. देवयानी फरांदे, सीमा हिरे, तोफखाना केंद्राचे ब्रिगेडियर ए. रागेश, महानगरपालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्यासह आर्टीलरी केंद्राचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. हेही वाचा >>> घोटी, माणिकखांब रेल्वेव्दार दोन दिवस बंद कार्यक्रमाच्या प्रारंभी हवेत फुगे सोडून प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. तसेच आर्टीलरीमार्फत घोडेस्वारीच्या माध्यमातून विशेष प्रात्यक्षिके दाखविण्यात आली. खासदार गोडसे यांनी आभार मानले. विद्यार्थ्यांचा प्रतिसाद सैन्यातील शस्त्रसामग्रीचे प्रदर्शन पाहण्यासाठी शनिवारी उद्घाटन सोहळ्यास विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती. सातपेक्षा अधिक शाळांनी उद्घाटन सोहळ्यास हजेरी लावली. नियोजित वेळेपेक्षा कार्यक्रम काहीसा उशीराने सुरू झाला. विद्यार्थ्यांनी जोरदार आवाज देत अश्व पथकाच्या संचलनाला दाद दिली. वाद्य पथकानेही वेगवेगळी गीते सादर करत उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. यावेळी विद्यार्थ्यांसह उपस्थितांनी क्षेपणास्त्र, बंदुका, रडार यासह युध्दभूमी तसेच सीमारेषेवर वापरण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या उपकरणांची माहिती जाणून घेत आपल्या शंकांचे समाधान केले. शिशुवर्गातील चिमुकल्यांनीही प्रदर्शनास भेट दिली तेव्हा त्यांचे रांगेत जाणे, येणे आपल्या बोबड्या शब्दात काही प्रश्न विचारणे, यामुळे सैनिकांच्या चेहऱ्यावरही हसु उमटले. चिमुकल्यांसह तसेच नाशिककरांना सैनिकांसह सेल्फी काढण्याचा तसेच त्यांच्याशी हस्तांदोलन करण्याचा मोह आवरला नाही.