नाशिक : अवकाळी पाऊस, गारपीट आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे जिल्ह्यातील वातावरणात कमालीचे बदल झाले असून बुधवारी दुपारनंतर अक्षरश: हुडहुडी भरल्याची स्थिती निर्माण झाली. आदल्या दिवशीच्या तुलनेत पारा सात अंशांनी घसरून २८.३ अंशावर आला. तीव्र ऊन आणि कमालीच्या उकाड्याने हैराण झालेल्या नाशिककरांना ऐन उन्हाळ्यात गारठ्याची अनुभूती मिळत आहे.

मागील दोन दिवसांपासून ग्रामीण भागात गारपिटीसह हजेरी लावणाऱ्या पावसाचे रात्री शहरात आगमन झाले. बुधवारी दुपारी वादळी वाऱ्यासह अनेक भागात मुसळधार पाऊस झाला. वातावरणातील बदलामुळे पारा हळूहळू खाली उतरत असताना बुधवारी मात्र तो झपाट्याने घसरला. मंगळवारी ३५.३ अंश तापमानाची नोंद झाली होती. बुधवारी त्यात सात अंशांनी घट झाली. या दिवशी २८.३ अंश तापमानाची नोंद झाल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. हवेत कमालीचा गारवा पसरला आहे. या दिवशी बहुतांश भागात सूर्यदर्शन झाले नाही. उन्हाच्या झळा काही प्रमाणात कमी झाल्या. हवेत गारवा असल्याने नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळाला.

मेच्या प्रारंभीच पारा उंचावून ४० अंशावर पोहोचला होता. त्यामुळे या महिन्यात उच्चांकी तापमानाची नोंद होईल, अशी शक्यता वर्तविली जात होती. हवामानातील बदलामुळे तापमानात घट झाली. गारपीट, पाऊस आणि वादळी वाऱ्याने उकाडा गायब होऊन थंडी अवतरल्याचे चित्र निर्माण झाले.