कोथिंबीर १०० रुपये जुडी; आवक कमी झाल्याने दरांत वाढ

नाशिक : किरकोळ बाजारात भाज्यांचे दर कडाडले असून बहुतांश भाज्यांचे दर प्रतिकिलो ६० ते ९० रुपयांच्या घरात पोहोचले आहेत. कडाडलेल्या दरांमुळे ताटातील भाज्यांची जागा आता कडधान्ये, र्कोंशबीरने घेतली आहे. दिवाळीनंतर भाज्यांचे दर कमी होतील, असा अंदाज भाजी विक्रेत्यांनी व्यक्त केला.

काही महिन्यांपासून बदललेल्या वातावरणाचा सर्वाधिक परिणाम शेतीवर झाला. अवकाळी पावसामुळे शेतमालाचे नुकसान झाले. परिणामी मागील आठवड्यापासून भाज्यांचे दर सातत्याने वाढत आहेत. पालेभाज्यांचे दरही वाढले असून किरकोळ बाजारात ३० रुपये जुडी अशी किंमत मोजावी लागत आहे. मेथीचा दर सर्वाधिक म्हणजे ५० रुपये जुडी असा आहे. बीट, हिरवे मटार बाजारातून गायब आहे. अवकाळी पावसाने शेतातील भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले. यामुळे आता बाजारपेठेत भाज्यांची फारशी आवक होत नाही. ज्या भाज्या बाजारात येतात, त्यांचे दर वाढलेले आहेत. १० रुपये पावशेरने विकली जाणारी ढोबळी मिरची २५ रुपयांच्या घरात पोहोचली आहे. ३०० ते ३५० रुपयांना मिळणारे कॅरेट सध्या १ हजार २०० रुपयांच्या घरात पोहोचले आहे. अशीच स्थिती अन्य भाज्यांची आहे. ग्राहकांना ही स्थिती माहिती नाही. यामुळे काही जण वाद घालत

राहतात.  दिवाळीनंतर हे चित्र बदलेल, अशी अपेक्षा भाजी विक्रेते गणेश पाणगे यांनी व्यक्त केली. भाज्यांचे दर वाढल्याने सणासुदीच्या काळात महिला वर्गाचे अंदाजपत्रक कोलमडले आहे. पाव किलो भाज्यांसाठी २० ते ३० रुपये मोजावे लागत आहे. त्यामुळे कोणती भाजी खरेदी करावी, असा प्रश्न पडतो आहे.   मुलांच्या आवडी-निवडी, घरातील पथ्यपाणी पाहता भाज्या खरेदी करतांना काळजी घ्यावी लागते. सध्या मोड आलेली कडधान्ये, डाळी यावर भर दिला जात असल्याचे भक्ती महाले यांनी सांगितले.