काटकसरीने वापर करण्याचे आवाहन मनमाड : शहरातील पाणी वितरणाच्या दिवसांमध्ये दोन ते तीन दिवसांनी वाढ करण्यात आल्याने शहराला यापुढे पाणी वितरण १४ ते १५ दिवसांनी होणार आहे. म्हणजेच महिन्यातून फक्त दोन वेळा पाणीपुरवठा होणार आहे. नागरिकांनी पाण्याचा अपव्यय करू नये. काटकसरीने वापर करावा, असे आवाहन पालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक डॉ. सचिनकुमार पटेल आणि पाणीपुरवठा अभियंता अमृत काजवे यांनी पत्रकाद्वारे केले आहे. सद्य परिस्थितीमध्ये मनमाड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वागदर्डी धरणात सद्य:स्थितीतील नियोजनानुसार म्हणजे १० ते १२ दिवसाआड पुढील दीड महिना पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. मात्र मनमाड - लासलगांवदरम्यान रापली गावाजवळ मनमाड नगर परिषदेची मुख्य पाईपलाईन रेल्वेचे काम सुरू असताना नादुरुस्त झालेली आहे. सदर पाईपलाईन दुरुस्तीचे काम युध्दपातळीवर सुरू असून सदरचे काम १० ते १५ दिवसांत पूर्ण होणे अपेक्षित आहे. यादरम्यान पालखेड धरणातून उपलब्ध होणारे आवर्तनाचे पाणी पाईपलाईन दुरुस्त झाल्याशिवाय घेता येणे शक्य नसल्याने सदर आवर्तन उशिराने सोडण्याची विनंती वरिष्ठ कार्यालयास करण्यात आली आहे. प्राप्त परिस्थितीमुळे उपलब्ध पिण्याच्या पाण्याच्या साठय़ाचे योग्य नियोजन करताना पाणीसाठा पुढील एक ते दोन महिन्यांपर्यंत पुरविणे अत्यंत गरजेचे असल्याने नाइलाजास्तव शहरातील पाणी वितरणाच्या दिवसांमध्ये पुढील दोन ते तीन आवर्तनाकरिता दोन दिवसांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे शहराला यापुढील पाणीपुरवठा १५ दिवसांनी होईल. नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. नगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन मुख्याधिकारी डॉ. पटेल यांनी केले आहे. तसेच शहरातील ज्या नळधारकांच्या नळांना तोटय़ा नाहीत, ज्यांच्या नळजोडण्या तुटलेल्या आहेत, अशा नळधारकांनी नळजोडण्या दुरुस्त करून घ्याव्यात अन्यथा त्यांच्या नळजोडण्या परस्पर बंद करण्यात येतील. संबंधितांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशारा पालिका प्रशासनाने निवेदनाद्वारे दिला आहे. सध्या मनमाड शहराला १२ ते १३ दिवसांआड पाणीपुरवठा होतो तो यापुढे १५ दिवसांनी होणार आहे. म्हणजे मनमाडकरांना यापुढे महिन्यातून फक्त दोन वेळेस पाणीपुरवठा होईल. सध्या उन्हाळय़ाचे दिवस आहेत. या दिवसात पाण्याची निकड जास्त असते. नेमकी याच वेळेला पालिकेने पाणी वितरणाच्या दिवसांत वाढ केल्यामुळे नागरिकांतून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.