मैत्रिणीच्या प्रतिकारामुळे प्राण वाचले नाशिक: इगतपुरीसह नाशिक तालुक्यात बिबटय़ांचा वावर वाढला असताना मुंबई-आग्रा महामार्गावरील पाडळी (देशमुख) येथील गोदामाजवळ बिबटय़ाने केलेल्या हल्ल्यात महिला जखमी झाली. तिच्यासोबत असलेल्या दुसऱ्या महिलेने प्रतिकार केल्याने बिबटय़ा पळाला. सोमवारी पहाटे साडेसहा वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला. सतत वाहनांची वर्दळ असणाऱ्या महामार्गावर बिबटय़ाचा महिलेवर हल्ला झाल्याने बिबटय़ाला पकडण्यासाठी त्वरीत पिंजरा लावण्यात यावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे. सुरेखा विभुते (३०) आणि शांताबाई रेपूकर (४०) या दोघी नाशिकच्या मुंबई नाका परिसरातील म्हाडा घरकुल संकुलात राहतात. त्या दोघी पहाटे साडेसहा वाजेच्या सुमारास पाडळी (देशमुख) येथे महामार्गावरील एका गोदामाजवळ भंगार गोळा करण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी सुरेखा यांच्यावर बिबटय़ाने झडप घातली. हे पाहताच प्रसंगावधान राखून शांताबाईने बिबटय़ाला हुसकावून लावण्याचा प्रयत्न सुरू केला. तिच्या प्रतिकारामुळे काही वेळाने गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या सुरेखाला तिथेच सोडून बिबटय़ा पळून गेला. जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या मोफत रुग्णवाहिकेचे रुग्णमित्र निवृत्ती पाटील गुंड यांनी गंभीर जखमी महिलेला नाशिकच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे.