नाशिक : त्र्यंबकेश्वरच्या अति दुर्गम भागातील मूलवड या ग्रामपंचायतीतंर्गत अनेक गावे, पाडे येतात. येथील महिलांना अनेक वर्षांपासून पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. आजही गावात येणाऱ्या टँकरमधील पाणी मिळविण्यासाठी एकच झुंबड उडते. बऱ्याचदा यामुळे वादाचे प्रसंग उद्भवतात. जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा, हरसूल भागात टंचाई सातत्याने जाणवत राहते. टंचाई दूर करण्याचे आश्वासन लोकप्रतिनिधी तसेच शासन, प्रशासनाकडून कायमच दिले जाते. परंतु, गांभीर्याने कोणतेच प्रयत्न होत नसल्याने या भागात टंचाई कायम राहते. टंचाई परिस्थितीची पाहणी करण्यासाठी एखाद्या मंत्र्यांचा दौरा असला की, प्रशासनाकडून तातडीने हालचाली केल्या जातात. टंचाईग्रस्त भागास पाणी पुरवठय़ासाठी कोणकोणते प्रयत्न केले जात आहेत, ते सांगितले जाते. दौरा आटोपला की पुन्हा या गावांकडे अधिकारी ढुंकूनही पाहत नाहीत. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील मूलवड ग्रामपंचायत त्यापैकीच एक आहे. या ग्रामपंचायत अंतर्गत असलेली गावे जवळपास तीन ते चार किलोमीटर क्षेत्रात आहेत. या सर्वच गावांना पाण्याची भीषण टंचाई आहे. अनेक ठिकाणी नळपाणी पाणीपुरवठा योजनेचे काम झालेले असले तरी त्या सुरुवातीपासून मृत अवस्थेत आहेत. वळण, सावरीचा माळ, घोटबारी, कोटबी, बुरुज या गावांना पाण्यासाठी रात्रंदिवस संघर्ष करावा लागतो. विशेष म्हणजे या ठिकाणी आता एका सामाजिक संस्थेकडून पाणीपुरवठा होत आहे. गावांमध्ये नियमित पाणीपुरवठा व्हावा यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवूनही त्यावर कोणतीही कार्यवाही झालेली नाही, अशी तक्रार सामाजिक कार्यकर्ते पिंटू रंध्ये यांनी केली आहे. एकीकडे कोटय़वधी रुपयांच्या नळपाणी पुरवठा योजना प्रत्येक वर्षी मंजूर होऊनही त्या कुचकामी ठरत आहेत. येथील पाण्याची भीषणता दिवसेंदिवस वाढत असून लोकप्रतिनिधीच्या हंडामुक्त तालुका करण्याच्या वल्गना हवेत विरत आहेत. आमच्या पिढय़ा न पिढय़ा पाण्यासाठी वणवण करतात. लोकप्रतिनिधी केवळ मतदानाच्या दिवशी पाण्याचे आमिष दाखवून नंतर पाठ फिरवतात. आम्ही मात्र जानेवारी उजाडला की हंडाभर पाण्यासाठी रानोमाळ भटकत राहतो, अशी व्यथा महिलांनी व्यक्त केली. पाणी द्या आणि मतदान घ्या लवकरच पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका होणार असल्याने प्रत्येक पक्षाचे उमेदवार, या आदिवासी भागातील जनतेची मते मिळवण्यासाठी नवीन क्लृप्तय़ा काढून दौरे करीत आहेत. बहुतेक गावातील महिलांनी त्यांच्याबद्दल नाराजी व्यक्त केली असून यापुढे तुम्ही आम्हाला पाणी द्या, तरच आमचे मत देऊ, असा पवित्रा महिलांनी घेतला आहे.