महिला दिन विशेष चारूशीला कुलकर्णी नाशिक: पाण्याचा प्रश्न लई वंगाळ..मुंडा उचला आण् बिगीने पाय उचलत विहीर, झरा गाठत रहा..पाणी नाय मिळालं तर कधी कंबरेत तर कधी थोबाडय़ावर बसते.. विहिरीच्या काठावर तर भांडणं हायतीच..रात्री-बेरात्री पाणी भरतांना डोळय़ावर झोप जावी, जनावराला भ्याव वाटावं म्हणून लाकूड जाळतो. त्याचा खर्च डोक्यावर बसतो.. ही व्यथा त्र्यंबकेश्वर भागातील महिलांची आहे. दिवस कुठलेही असो. पाणी प्रश्न या महिलांच्या पाचवीला पूजलेला. शहरात थाटात साजरा होणारा महिला दिन त्यांच्यापर्यंत पोहचलेला नाही. तसं त्याचं अप्रुपही त्यांना नाही. फक्त माठात, हंडय़ात पाणी असावं. त्या हंडाभर पाण्यासाठी करावी लागणारी वणवण थांबावी हीच त्यांची अपेक्षा. यंदा पाऊसमान चांगले नसले तरी अधूनमधून पडलेल्या अवकाळी पावसाने फेब्रुवारी अखेरीस जाणवणारा पाणी प्रश्न काही दिवस थोडा पुढे ढकलला गेला. मार्च महिन्यात उन्हाचा तडाखा जाणवण्यास सुरूवात झाल्यावर गाव परिसरात पाणी प्रश्न जाणवण्यास सुरूवात झाली आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील घोटबारी, मूलवड पाडा परिसरात पाण्याची समस्या जाणवण्यास सुरूवात झाली आहे. गावात तीन ठिकाणी कूपनलिका करुनही पाणी नाही. पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी पाडय़ावरील लोकांनी सध्या चौरा पाडाचा रस्ता धरला आहे. या ठिकाणी नळाद्वारे पाणी सोडले जाते. त्यावेळी तेथील रहिवाश्यांशी तसेच मूलवड पाडय़ावरील लोकांशी पाण्यावरून वाद होत राहतात. सध्या पाणी साठा असला तरी जनावरांना पिण्यासाठी पाणी मिळणे गरजेचे आहे. हा साठा शिवांगा म्हणजे होळी झाल्यावर संपेल. तेव्हा पिण्याच्या पाण्यासाठी एक ते दीड किलोमीटर दरड उतरत नदीचा काठ गाठावा लागेल. याविषयी अहिल्या घाटाळ यांनी माहिती दिली. एक हंडा पाण्यासाठी नदी खाली उतरून जावे लागते. हंडा डोक्यावर असतो. एक तास चढायला लागतो. म्हाताऱ्या माणसाला दोन तास लागतात. दिवसाला चार ते पाच हंडे पाणी लागते. अशीच परिस्थिती हरसूल परिसरातील कौलपाडा, उंबरदरी, गारमाळ, भागओहोळ, काकडवळण, मुंरबी गावठा, वळण, बारीमाळ, वाघचौडास मानीपाडा, खरवलं, तोरंगण येथील आहे. बेलपाली येथील गंगुबाई वाघ यांनी घरी वीज नसल्याने रात्री दिवाबत्ती करण्यासाठी १०० रुपयाचे डिझेल खरेदी करावे लागते, असे सांगितले. महिन्याला एक लिटर डिझेल लागते. खाण्याचे तेल परवडत नाही. तिथे कमी करून हा खर्च भागवावा लागत आहे. वाडय़ाचा माळ येथील अनुसमा मौळे यांनी मे महिन्यात पाणी टंचाईला तोंड द्यावे लागते, असे सांगितले. आजही डोक्यावरुन हंडा वाहावा लागतो. गावाशेजारी केटी बंधारा बांधला, नदी आहे पण पाणी प्रश्न सुटलेला नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. दिवसाकाठी १० ते १५ लिटर पाणी एकावेळी हंडा, बादलीच्या माध्यमातून वाहतांना महिलांना मान, पाठ, कंबरदुखीचे दुखणे लागले आहे. अनेकींना गरजेपुरता पाणी मिळालं नाही तर घरच्याकडून मारहाण ठरलेली आहे. यात पाळीचे चार दिवस, गरोदरपणातही पाणी वाहण्याला पर्याय नसतो. या सततच्या कामामुळे महिलांना वेगवेगळय़ा व्याधींना तोंड द्यावे लागत आहे.