आणखी सहा महिने प्रतीक्षा नवी मुंबई : नवी मुंबई परिवहन उपक्रमात यापूर्वी दाखल झालेल्या विद्युत बस तोटय़ात चाललेल्या उपक्रमासाठी फायदेशीर ठरत असल्याने पुढील शंभर बसकडे प्रशासनाचे लक्ष लागून होते. जून, जुलै महिन्यात या बस येणे अपेक्षित होते, मात्र करोना संकटामुळे त्या लांबणीवर पडल्या आहेत. आणखी सहा महिने उशीर होईल असे प्रशासनाने सांगितले. केंद्र सरकारकडून ‘फेम १’ योजनेअंतर्गत ६० टक्के अनुदानातून नवी मुंबई परिवहनसेवेच्या ताफ्यात या ३० विद्युत बस मिळाल्या आहेत. या बस वातानुकूलित असून पहिल्या टप्प्यासाठी ९ रुपये तिकीट आकारले जात आहे. पालिकेने मार्ग क्रमांक ९ वाशी रेल्वे स्थानक ते घणसोली घरोंदा, मार्ग क्रमांक २० घणसोली ते नेरुळ आणि मार्ग क्रमांक १२१ घणसोली ते ताडदेव, मार्ग क्रमांक १०५ सीबीडी बस स्थानक ते वांद्रे रेल्वे स्थानक असे चार प्रवासी मार्ग सुरू केले होते. या सर्वच मार्गावर प्रवाशी या बसला पसंती देत आहेत. त्यामुळे आणखी शंभर बस घेण्याची तयारी परिवहन उपक्रमाने दाखवली असून हा प्रस्ताव मंजूर केला असून केंद्राकडे पाठविला आहे. या बस जून, जुलैपर्यंत येणे अपेक्षित होते. मात्र दरम्यान आलेल्या करोना संकटामुळे तो प्रस्ताव लांबणीवर पडला आहे. पर्यावरणपूरक विद्युत बसमुळे प्रदूषणालाही आळा बसत असून इंधन बचतीलाही हातभार लागत आहे. विद्युत बस फायदेशीर विद्युत बस साधारणत: दिवसाला १८४ किलोमीटर तर महिनाभरात सरासरी ५ हजार किलोमीटर धावते. प्रत्येक किलोमीटरला फक्त ५ रुपये खर्च येत आहे. डिझेलवर चालणाऱ्या एका वातानुकूलित बसला अंदाजे ३५ रुपये तर साध्या बसला २३ रुपये खर्च येतो. त्यामुळे महिनाभरात ३० बसमुळे परिवहनची ४५ लाख रुपयांची बचत होत आहे. करोना संकटामुळे परिवहनची आर्थिक परिस्थिती अधिकच कोलमडली आहे. पालिकेच्या ५०० पैकी २७५ बसेस सुरू आहेत तर ५५ बस या करोनाच्या व्यवस्थेसाठी आहेत. परिवहनचा तोटा ५.५ कोटींवरून दुपटीने वाढला आहे. विद्युत बस आल्या तर फायदेशीर ठरतील. -शिरीष आरदवाड, परिवहन व्यवस्थापक