सोमवारपासून ’एनएमएमटी’च्या ३०० बसगाडय़ा पूर्ण क्षमतेने धावणार

नवी मुंबई : करोना निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. मात्र लोकलसेवा नसल्याने  प्रवाशांचे हाल वाढणार आहेत. त्यामुळे नवी मुंबई परिवहन उपक्रमाने आपल्या बसची संख्या वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारपासून ३०० बसच्या फेऱ्या  करण्यात येणार आहेत.  यापूर्वी २०० ते २५० बस सेवा देत होत्या.

यापूर्वी सराकारी कार्यालयात ५० टक्के च उपस्थितीसाठी परवानगी होती. निर्बंध शिथिल करताना मंगळवारपासून सरकारी आणि खासगी कार्यालये सर्व मनुष्यबळासह सुरू करण्यास मुभा देण्यात आली आहे. त्याचबरोबर दुकाने दहापर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी दिली. मात्र तरीही सामान्य प्रवाशांना अद्यापही लोकल प्रवासासाठी परवानगी देण्यात आलेली नाही. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच लोकल प्रवासाची मुभा असल्याने सामान्यांची बेस्ट व एनएमएमटीच्या बस थांब्यावर गर्दी वाढू लागली आहे.  त्यामुळे नवी मुंबई परिवहन उपक्रमाने सेवेत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

नवी मुंबई परिवहन उपक्रमाच्या ताफ्यात एकूण ५५० बस आहेत. त्यापैकी सर्वसाधारण स्थितीमध्ये ४०० बस सेवा देत असतात. मात्र गेल्या वर्षी करोनासंसर्ग पसरल्यानतंर टाळेबंदी करण्यात आल्यानंतर सुरुवातीला बससेवा बंद होती. त्यानंतर अत्यावश्यक सेवेसाठी बस सुरू करण्यात आली, मात्र फक्त एनएमएमटीच्या ५६ बस सेवा देत होत्या. त्यानंतर हळहळू त्यात वाढ करण्यात आली. नंतर १५०, २०० व आता २७५ बस प्रवासी वाहतूक करीत आहेत. मात्र निर्बंध शिथिल करण्यात आल्याने प्रवाशांची संख्या वाढणार आहे.  त्यामुळे एनएमएमटी प्रशासनाने आपल्या बसची संख्या वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारपासून ३०० एनएमएमटी बस सेवा देतील. तर पुढील काळात यात वाढ करण्यात येणार असून सप्टेंबपर्यंत पूर्ण क्षमतेने बससेवा सुरू करण्याचे नियोजन आखण्यात आले आहे.

करोनाच्या निर्बंधांमध्ये शिथिलता देण्यात आल्याने पालिका परिवहन उपक्रमाच्या बस वाढवण्यात येत आहेत. सोमवारपासून ३०० बस रस्त्यावर धावतील असे नियोजन करण्यात आले आहे.

-शिरीष आरदवाड, व्यवस्थापक, एनएमएमटी