मार्च २०२१ पर्यंत पुरेल इतका साठा 

नवी मुंबई : नवी मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मोरबे धरण परिसरात पावसाचा जोर वाढल्याने  हे धरण ६५ टक्क्यांपर्यंत भरले आहे. या धरणात  २८ मार्च २०२१ पर्यंत पुरेल इतका  जलसाठा झाला आहे. धरण पूर्ण पातळीला भरण्यासाठी  अजूनही जवळजवळ एक हजार ७००  मिमी पावसाची आवश्यकता आहे.

नवी मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मोरबे धरणात गेल्यावर्षी ५२५१.२० मिमी. इतका विक्रमी पाऊस झाला होता. त्यामुळे धरणात मुबलक साठा झाला होता. गतवर्षी मोरबे धरणही भरले होते.

मोरबे धरणात पुढील सात महिने पुरेल इतका जलसाठा  आहे. मोरबे धरण मागील सलग तीन वर्ष पूणपणे भरले होते.

मागील आठवडय़ात झालेल्या मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. परंतु, मोरबे धरण परिसरात नवी मुंबई पालिकाक्षेत्रात कमी पाऊस झाला आहे.  मागील महिन्यात मोरबे धरणात फक्त ४९ टक्के धरण भरले होते.परंतू मागील पंधरा दिवसात धरण परिसरात चांगला पाऊस झाल्याने जलसाठा वाढला आहे.

यावर्षी पावसाला सुरवात झाली तेव्हा धरणात फक्त ४० टक्के जलसाठा म्हणजेच ६८.१६३ दशलक्ष घनमीटर पाणी धरणात शिल्लक होते. सध्या धरणात  ९४.२४३ दशलक्ष घनमीटर जलसाठा  शिल्लक आहे. त्यामुळे २८ मार्च २०२१ पर्यंत शहराला पाणीपुरवठा करता येईल एवढा जलसाठा शहरात आहे.म्

मोरबे धरणाची पाणी साठवण्याची क्षमता १९०.८९ एवढी असून धरण ८८ मीटर पातळीला पूर्ण भरते. स्वातंत्र्यानंतर स्वत:च्या मालकीचे धरण असणारी नवी मुंबई महापालिका ही देशातील एकमेव महापालिका आहे.त्यामुळे नवी मुंबई शहराला जलसंपन्न शहर संबोधले जाते.