पर्यावरणविषयक परवानगीची अडचण;  सिडकोची दोनशे कोटी रुपये देण्याची तयारी

नवी मुंबई राज्याच्या पायाभूत सुविद्या समितीने दोन वर्षांपूर्वी हिरवा कंदील दिलेल्या वाशी खाडीपुलावरील तिसऱ्या खाडीपुलाचे या महिन्यात सुरू होणारे काम पर्यावरणविषयक परवानगी न मिळाल्याने रखडले आहे. विद्यमान दोन खाडीपुलाच्या मधोमध दोन्ही बाजूस तीन मार्गिका असलेल्या या पुलावर ७७५ कोटी रुपये खर्च केले जाणार असून, मागील वर्षी पात्रता स्वारस्य निविदा पूर्ण केल्यानंतर हे काम सुरू होणार होते. सिडकोने या प्रकल्पासाठी दोनशे कोटी रुपये देण्याची तयारी दर्शवलेली आहे.

मुंबई-नवी मुंबईला जोडणाऱ्या वाशी खाडी पुलावरील दोन पुलांवर सकाळ-संध्याकाळ होणाऱ्या प्रचंड वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून राज्य रस्ते विकास महामंडळाने ऑक्टोबर २०१६ मध्ये पर्यायी उड्डाणपुलासाठी पाहणी केली होती. त्यानंतर या दोन खाडीपुलाजवळ तिसरा पूल कसा बांधता येईल यासाठी एका खासगी संस्थेने पुलाचा अभ्यास अहवाल तयार केला आहे. गेल्या वर्षी जून महिन्यात या संस्थेच्या सर्वेक्षणाला एमएसआरडीसी व नंतर सरकारच्या पायाभूत सुविधा समितीने हिरवा कंदील दाखविला होता. सुमारे ७७५ कोटी ५८ लाख रुपये खर्चाच्या या पुलासाठी गेल्या वर्षी प्रथम स्वारस्य निविदा काढण्यात आली होती त्यात पाच कंत्राटदारांनी रस दाखविला होता. यंदा मार्च महिन्यात या पुलाच्या उभारणीला सुरुवात होणार होती, पण ते काम पर्यावरणविषयक परवानगी अद्याप प्राप्त न झाल्याने रखडले असल्याचे दिसून येत आहे. सिडको स्थापनेपूर्वी मुंबई व नवी मुंबईला जोडणारा खाडीपूल नव्हता. त्यामुळे मुंबईकर ठाणेमार्गे पुणे किंवा गोव्याला जात होते, तर नवी मुंबईकर छोटय़ा बोटीने किंवा ओहोटीच्या वेळी चालत मुंबईला जात होते. त्यानंतर १९७१ मध्ये या खाडीवर पहिल्या पुलाची उभारणी करण्यात आली. पहिल्यांदा केवळ बारा हजार वाहनांची दिवसाला ये-जा होईल असा सव्‍‌र्हे असताना आज अडीच लाखांपेक्षा जास्त वाहने या पुलावरून ये-जा करीत आहेत. शीव-पनवेल महामार्गाचे रुंदीकरण झाल्यापासून ही संख्या वाढली आहे. त्यामुळे शीव-पनवेल महामार्ग दहा पदरी आणि टोल नाक्यापुढील खाडीपूल सहा पदरी असल्याने या कोंडीत दिवसेंदिवस भर पडत आहे. तिसऱ्या पुलाचे काम पुढील महिन्यात सुरू होईल, असे एमएसआरडीसी सूत्रांनी सांगितले.

तिसऱ्या पुलाची नितांत गरज

पहिला पूल अपुरा पडू लागल्याने वीस वर्षांने एक हजार २०० कोटी रुपये खर्च करून दुसरा पूल बांधण्यात आला. त्यामुळे पहिला पूल जड वाहनांसाठी बंद करण्यात आला असून काही महिन्यांपूर्वी दुसऱ्या पुलालाही तडे गेल्याने एक महिना पुलाची एक बाजू बंद ठेवण्यात आली होती. त्यावेळी होणारी वाहतूक कोंडी अतिशय अभूतपूर्व होती. त्यामुळे तिसऱ्या पुलाची नितांत गरज असताना हा या पुलाच्या कामाला अद्याप सुरुवात झालेली नाही. त्यामुळे दोन्ही पुलाच्या दुतर्फा सकाळ-संध्याकाळ वाहतूक कोंडी नित्याचीच झाली आहे. या महिन्यात कामाला सुरुवात झाल्यानंतर तीन वर्षांत हे काम पूर्ण करण्यात येणार आहे. परवानगी लवकर न मिळाल्यास हे काम रखडण्याची शक्यता आहे.

मुंबई आणि नवी मुंबईला जोडणाऱ्या तिसऱ्या उड्डाणपुलाची निर्मिती करण्याचा निर्णय सरकारने घेतला असून त्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. काही पर्यावरणविषयक परवानग्या अद्याप न मिळाल्याने यंदा सुरू होणारे हे काम पुढील महिन्यात सुरू होईल असा विश्वास आहे.

– अनिल गायकवाड, मुख्य अभियंता, एमएसआरडीसी