ट्रकच्या धडकेमुळे नऊ गाडय़ांचे नुकसान

नवी मुंबई : महापे-कोपरखैरणे मार्गावर जात असताना एका ट्रकचालकाचे नियंत्रण सुटल्याने मोठा अपघात झाला. या अपघातात नऊ गाडय़ांचे नुकसान झाले असून ट्रकचालक फरार झाला आहे.

गुरुवारी दुपारी एकच्या सुमारास महापे-कोपरखैरणे दरम्यानच्या उड्डाणपुलावरून एक ट्रक कोपरखैरणेच्या दिशेला जात असताना उड्डाणपूल उतरताना त्याचे ट्रकवरील नियंत्रण सुटले आणि या ठिकाणी असलेल्या इमारतींच्या बाहेरील पार्किंगमधील गाडय़ांवर या ट्रकने धडक दिली. त्यात पाच चारचाकी आणि चार दुचाकी वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. ही घटना घडल्यानंतर ट्रकचालक फरार झाला असून कोपरखैरणे पोलीस त्याचा शोध घेत आहेत, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप तीदार यांनी दिली आहे.