आदर्श को-सोसायटी, सीवूड, सेक्टर-४८-अ

नवी मुंबई महापालिका स्वच्छतेत देशात आठव्या क्रमांकावर आहे. हे स्थान आणखी उंचावावे, यासाठी पालिका प्रयत्नशील आहे आणि नवी मुंबईकरही पालिकेच्या प्रयत्नांना चांगली साथ देत आहेत. सीवूड्स येथील आदर्श को-ऑपरेटिव्ह सोसायटी हे त्याचे एक उदाहरण आहे.

कचरा वर्गीकरण न करणाऱ्या सोसायटय़ांचा कचरा न उचलण्याचा रास्त निर्णय नवी मुंबई महापालिकेने घेतला आणि नवी मुंबईत नानाविध प्रतिक्रिया उमटू लागल्या. काही सोसायटय़ांनी समाधान व्यक्त केले, तर काही सोसायटय़ांनी अडेलतट्टू भूमिका स्वीकारली. पालिका निर्णयावर ठाम राहिल्यामुळे आता बहुतेक सोसायटय़ांनी कचरा वर्गीकरणास सुरुवात केली आहे. सीवूड्स सेक्टर-४८ अ मधील आदर्श को-ऑपरेटिव्ह सोसायटी मात्र स्वयंस्फूर्तीने कचरा वर्गीकरण करीत असून आता या संकुलाने शून्य कचऱ्या दिशेने पावले टाकण्यास सुरुवात केली आहे.

आदर्श संकुलातील सदस्य स्वत: पुढाकार घेऊन आवाराची साफसफाई करतात. महापालिकेतील काही अधिकारी या संकुलात राहतात. त्यांनी पुढाकार घेऊन शून्य कचरा संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. सोसायटीच्या आवारात सेंद्रिय खतनिर्मिती करण्यात येणार आहे.

संकुलाची स्थापना २००० साली झाली. या संकुलात एकूण १२८ सदनिका आहेत. सुरुवातीला संकुलाच्या समितीला दैनंदिन कामांतून सांस्कृतिक कार्यक्रम साजरे करण्यासाठी वेळ मिळत नसे. येथील रहिवासी जेवढे नावीन्यपूर्ण प्रकल्प राबवण्यात उत्साही असतात, तेवढेच विविध उत्सव साजरे करण्यास उत्सुक असतात. त्यामुळे कालांतराने संकुलातील इतर सदस्यांनी आदर्श संस्कृतिक समिती स्थापन केली. समितीच्या माध्यमातून आज विविध सण, उत्सव साजरे केले जातात, अशी माहिती सदस्यांनी दिली.

संकुलात वर्षभर उत्सवी वातावरण असते. प्रजासत्ताक दिनी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. संकुलातील रहिवासी संपूर्ण विभागात सामाजिक संदेश देण्यासाठी प्रभाग फेरी काढतात. रांगोळी स्पर्धा, खेळ, सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. नैसर्गिक आणि कोरडे रंग वापरून, पाण्याचा अपव्यय टाळून होळी आणि रंगपंचमी पर्यावरणस्नेही पद्धतीने आणि उत्साहात साजरी केली जाते. कोजागरी पौर्णिमेला रहिवाशांचे स्नेहसंमेलन असते.

संकुलाच्या आवारात वृक्ष संवर्धन करण्यात आले आहे.

त्यामध्ये नारळ, आंबा, पेरू तसेच फुलझाडांचा समावेश आहे. संकुलाच्या छतावर शेड बसविण्यात आली आहेत. येत्या काळात पर्जन्य जलसंधारणाचा उपक्रमही राबवण्याचा विचार संकुलातील सदस्य करीत आहेत. पावसाचे पाणी जमिनीत साठवून त्याचा पुनर्वापर करण्यात येणार आहे.

एकत्र फराळ, सामुदायिक तुळशी विवाह

दिवाळीत येथील रहिवासी, मुले, महिला स्वत: पुढाकार घेऊन दिवाळी पहाट या कार्यक्रमाचे आयोजन करतात. सर्व जण आपापल्या घरातून फराळ आणतात व संपूर्ण संकुल एखाद्या मोठय़ा कुटुंबाप्रमाणे फराळाचा एकत्र आस्वाद घेते. संकुलात सामुदायिक तुळशी विवाहदेखील केले जातात.