गेली सहा वर्षे प्रशासकीय राजवट असलेल्या राज्यातील सर्वात मोठय़ा मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीवर अखेर सभापती, उपसभापतींची बिनविरोध निवड झाली. सभापतीपदी मराठवाडय़ातील अशोक डक यांची तर उपसभापतीपदी पुण्याच्या धनंजय वाडकर यांची निवड झाली आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीवर महाविकास आघाडीची सत्ता आली आहे. राज्यातील १२ शेतकरी प्रतिनिधी व बाजार समितीच्या पाच जागांच्या संचालक पदासाठी ही निवडणूक झाली होती. तसेच कामगार प्रतिनिधी मतदारसंघातून बिनविरोध निवड झाली होती. महाविकास आघाडीचे १६ तर दोन अपक्ष विजयी झाले होते. करोना सावट आणि १५ मार्चनंतर टाळेबंदी जाहीर झाली त्यामुळे सभापतीपदाची निवडणूक लांबली होती. नुकताच केंद्र शासनाने बाजार समितीतून सर्व शेतमालाला नियमनमुक्त केले आहे. त्यामुळे बाजार समितीच्या उत्पन्नात घट होणार असून, अस्तित्व धोक्यात आले आहे. त्यामुळे आता नव्या संचालक मंडळापुढे आव्हान आहे. शेतकरी आणि व्यापारी या दोघांमध्ये समन्वय साधून हे नवीन संचालक मंडळ या दोन्हीमधील एक दुवा म्हणून समितीच्या उत्कर्षांसाठी काम करेल. केंद्र शासनाने नियमनमुक्तीच्या अध्यादेशाची अंमलबजावणी करू नये असे निवेदन मुख्यमंत्री, सहकार-पणनमंत्री यांना देण्यात आले आहे. आता महाविकास आघाडीचे सरकार असल्याने या समस्या लवकरच मार्गी लागतील अशी अपेक्षा आहे . - अशोक डक, सभापती, एपीएमसी