एकावेळी तीन ते चार जणांची वाहतूक
नवी मुंबई : नवी मुंबईतही करोना रुग्णांत वाढ होत असल्याने शहरात कडक निर्बंध लागू करण्याचे पालिका प्रशासनाने ठरविले आहे. मात्र शहरात रिक्षा वाहतुकीत नियमांची पायमल्ली होत आहे. एकावेळी शहर वाहतुकीत तीन ते चार प्रवाशांची वाहतूक करण्यात येत आहे. हा सर्व प्रकार पोलिसांच्या डोळयासमोर सुरू असताना मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे.
टाळेबंदी काळात रिक्षात केवळ एक प्रवासी आणि टॅक्सीत दोन प्रवाशांना मुभा होती. मात्र आता पूर्वीप्रमाणेच वाहतूक करण्यात येत आहे. त्यामुळे आगामी काळात नवी मुंबईत टाळेबंदी लागली तर नवल नाही. नवी मुंबई करोना परिस्थिती नियंत्रणात आली होती. ५० ते ६० नव्या रुग्णांवरून आता ही संख्या शंभरपर्यंत पोहचली आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने कडक निर्बंध लागू करण्याचे ठरविले आहे. नियम सर्वच अस्थापना व व्यवस्थेला लागू करावे अशी मागणी होत आहे. सार्वजनिक वाहतुकीतील अंतर सोहळ्याचा नियम कसा पाळणार असा सवालही करण्यात येत आहे. तसेच नवी मुंबई रिक्षा प्रवासी वाहतुकीवरही निर्बंध घालावेत अशी मागणी होत आहे.
रिक्षात जास्तीत जास्त तीन प्रवासी वाहतुकीची परवानगी असताना चार प्रवासी वाहतूक होत आहे. निदान करोनाकाळत तरी चालकांनी याचे भान ठेवले पाहिजे. मात्र याकडे वाहतूक पोलीस आणि उपप्रदेशाईक परिवहन विभाग रिक्षा चालकांच्यावर कारवाई करण्यात रस दाखवत नाही. आजही शहरात रेल्वे स्थानक ते एमआयडीसी, वाशी-कोपरखैरणे, वाशी-घणसोली, सीबीडी-नेरुळ, पालिका मुख्यालय-जुई नगर रेल्वे स्टेशन, जुईनगर बस थांबा ते उलवा व नेरुळ स्टेशन ते उलवा नोड या मार्गावर सार्वधिक शेअर रिक्षा वाहतूक सुरू आहे. या ठिकाणी सद्यपरिस्थितीत प्रवाशी संख्येची मर्यादा पाळली जात नाही. तीनऐवजी चार प्रवासी वाहतूक करण्यात येत आहे. रिक्षा चालक चौथा प्रवासी घेतल्याशिवाय तळ सोडत नाही. त्याला विरोध केला तर कोणी साथ देत नाही. रिक्षाचालक एकत्रित भांडतात त्यामुळे नाइलाज होतो असे शिरीष पांडे या प्रवाशाने सांगितले. तर साहाय्यक पोलीस आयुक्त अरुण पाटील यांनी ही गंभीर बाब असल्याचे मान्य करीत पोलीस नियमीत कारवाई करीत असतात. मात्र विशेष मोहीम हाती घेत कारवाई करण्यात येईल असे सांगितले.
आमच्या संघटनेतील रिक्षाचालक सदस्यांना प्लास्टिक पडदे देण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे शेअर रिक्षा आणि मीटर रिक्षात नियमबाह्या प्रवासी वाहतूक न करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. तसे आढळ्यास सुरुवातीला सूचना देण्यात येतील व नंतर सदस्यत्व रद्द केले जाईल. -निशांत भगत, सल्लागार, एकवीरा, चालक-मालक संघटना
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 25, 2021 12:01 am