आमदार शशिकांत शिंदे यांचा पत्रकार परिषेदत आरोप नवी मुंबई : प्रारूप मतदार यादीतील मतदारांच्या नावांच्या फेरफार झाल्याचा प्रकार आता राजकीय मुद्दा झाला असून गणेश नाईक यांनी आर्थिक व्यवहार करीत पालिका अधिकाऱ्यांनी हा प्रकार केल्याचा आरोप केला होता. बुधवारी राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांनी या विषयासंदर्भात पत्रकार परिषद घेत भाजपनेच ५०० नव्हे तर १५०० रुपये देऊन नावे घुसवल्याचा गंभीर आरोप केला आहे. १६ फेब्रुवारी रोजी पालिका निवडणुकीसाठी प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी जाहीर करण्यात आली. पहिल्या दिवसापासूनच यावर सर्वच राजकीय पक्षांनी आक्षेप घेत यात मतदारांची अदलाबदल झाल्याचा आरोप केला आहे. मंगळवारी शेवटच्या दिवसापर्यंत सुमारे साडेतीन हजार हरकती नोंदवल्या असून आता हा प्रकार राजकीय मुद्दा बनला आहे. मंगळवारी आमदार आशिष शेलार यांनी पत्रकार परिषदेत या प्रकारची एसआयटी चौकशीची मागणी केल्यानंतर बुधवारी गणेश नाईक यांनी पालिकेच्या अधिकाऱ्यांनी प्रत्येकी ५०० रुपये घेऊन नावांत फेरबदल केल्याचा आरोप करीत पालिका मुख्यालयासमोर आंदोलनाचा इशारा दिला होता. याला शिवसेनेकडून विजय नाहटा यांनी उत्तर दिले होते. बुधवार शशिकांत शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत राष्ट्रवादीची भूमिका स्पष्ट केली. त्यांनी नाईक यांच्यावरच पलटवार करत भाजपनेच ५०० रुपये नव्हे तर १५०० रुपये देऊन नावे घुसवल्याचा आरोप केला आहे. नवी मुंबईत ९० हजार नावे बोगस असल्याचा आरोपही शिंदे यांनी यावेळी केला आहे. या प्रकरणी राज्य निवडणूक आयोगाला पुरावे साद करण्यात येतील. वेळ पडल्यास न्यायालयातही दाद मागणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे प्रारूप मतदार याद्यांवरूनच भाजप व महाविकास आघाडी यांच्यात खडाजंगी सुरू झाली असून हा राजकीय मुद्दा झाला आहे.