कळंबोली वसाहतीमधील सेक्टर २ मधील बठय़ा चाळीमध्ये राहणाऱ्या जाधव कुटुंबातील दोन भावांमध्ये मालमत्तेच्या वादात एकावर चाकूचे २३ वार करून निर्घृण हत्या झाल्यामुळे परिसरात एकच खळबळ माजली. या प्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव मंगेश जाधव असे आहे.मूळ रत्नागिरी जिल्ह्य़ातील असणारे जाधव कुटुंबीय एलआयजी बठय़ा वसाहतीमधील डी ११ या खोलीत राहत होते. जाधव कुटुंबातील मंगेश व राजेश या दोघा भावांमध्ये गावची पाच एकर जमीन नावावर करून की विक्री करून तिचा वाटा मिळण्याचा वाद होता. तसेच कळंबोली येथील राहते घर विकून त्यातील वाटा मिळण्याचा वाद सुरू होता. रविवारी सकाळी अकरा वाजता लहान भाऊ राजेश याने सुरा आणून मंगेशशी त्याच्या आईसमोर भांडण सुरू केले. मंगेशच्या पायावर राजेशने वार केल्यानंतर मंगेशने राजेशच्या हातामधील सुरा हिसकावून त्याच सुऱ्याने राजेशच्या पोटात व छातीत २३ वार केले. शेजाऱ्यांनी पोलिसांना कळविल्यावर कळंबोली पोलिसांनी मंगेशला अटक केली.