वेळेत पगार न मिळाल्याने मागील आठवडय़ात पालिका मुख्यालयासमोर आंदोलनानंतरही पगार न झाल्याने शुक्रवारी उद्यान विभागातील कर्मचाऱ्यांनी आपल्या कुटुंबीयांसह पालिका मुख्यालयात उद्यान विभागात ठिय्या मारला. यानंतर सायंकाळी यातील १५ कर्मचाऱ्यांचे वेतन ठेकेदाराने अदा केले असून इतरांचे सोमवारी वेतन देण्याचा आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. नवी मुंबई पालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार मिळालेला नाही, तर काहींचे वेतन कापण्यात आलेले आहे.

तर उद्यान विभागातील ६० कर्मचाऱ्यांचे दोन महिने पगार झालेले नाहीत. याविरोधात गुरुवारी (१४ नोव्हेंबर) रोजी पालिका मुख्यालयासमोर सफाई कर्मचाऱ्यांनी ठिय्या     मारला होता. पालिका अधिकाऱ्यांना मुख्यालयाच्या आवारातून बाहेर वा बाहेरून आत येण्यास मज्जाव केला होता. घनकचरा विभागाच्या अधिकाऱ्यांनी ‘स्मार्ट वॉच’ प्रणालीतील त्रुटी सुधारण्याची हमी दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले होते.

या आंदोलनानंतरही पगार न झाल्याने हे कर्मचारी कुटुंबीयांसह शुक्रवारी थेट उद्यान विभागाच्या दालनात शिरले. त्यांनी त्या ठिकाणी ठिय्या मारला. त्यानंतर सायंकाळी यातील १५ कर्मचाऱ्यांना ठेकेदाराने पगार झाले, तर उर्वरित कर्मचाऱ्यांचे सोमवारी पगार दिले जातील, असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

मागील आठवडय़ात महापालिकेचे तिन्ही दरवाजे बंद केले होते. यानंतर सोमवापर्यंत पगार होतील, असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र कामगारांचे वेतन झालेले नाही. त्यामुळे शुक्रवारी कुटुंबीयांसह आंदोलन करण्यात आले. – मंगेश लाड, अध्यक्ष, समाज समता कामगार संघटना

उद्यान विभागातील १७ पैकी एका ठेकेदाराने उद्यान कर्मचाऱ्यांचे वेतन दिले नव्हते. आज त्या ठेकेदराने काही कर्मचाऱ्यांचे वेतन दिले असून मंगळवापर्यंत इतरांचे वेतन सूचना दिल्या आहेत. – नितीन काळे, उपायुक्त, उद्यान विभाग