थंडीच्या मोसमाला उशिराने सुरुवात झाली असली तरी बदलत्या वातावरणामुळे हवेतील गारव्यात वाढ झाली असून काही दिवसांपासून उरण परिसरातील वातावरणातही गारवा जाणवू लागला आहे. वाढत्या गारव्याचा परिणाम जनजीवनावर होत असून तालुक्यात ठिकठिकाणी शेकोटय़ा पेटू लागल्या आहेत. या शेकोटय़ांभोवती आबालवृद्ध गोळा होत आहेत. मात्र शेकोटय़ांसाठी लागणारे गवत, झाडांचा पाला तसेच लाकडांचा तुडवडा भासू लागला आहे.
उत्तर भारतात थंडीचा जोर वाढल्याने जोरदार बर्फवृष्टी होऊ लागली आहे. त्यामुळे उरणसारख्या समुद्रकिनाऱ्यावरही गारवा जाणवू लागला आहे. थंडी आणि गारव्यापासून संरक्षण म्हणून अनेक ठिकाणी शेकोटय़ा पेटविल्या जात आहेत. उरण परिसरातील शेती कमी झाल्याने भातपिकाचा पेंढाही गायब झाला आहे. तसेच विकासाच्या नावाने अनेक ठिकाणी झाडांची कत्तल होत असल्याने शेकोटय़ांसाठी लागणारे गवत तसेच लाकडांचा तुटवडा भासू लागला आहे. त्यामुळे हातात मिळेल ते जमा करून तात्पूत्या स्वरूपात शेकोटय़ावर भागवावे लागत आहे.