महिनाभरात १८२ जण दगावले; मृत्यूदर ३.१३ वरून ३.२६ वर

संतोष जाधव, लोकसत्ता

नवी मुंबई :  पहिली टाळेबंदी उठवल्यानंतर ९ जुलैपर्यंत महिनाभरात करोनाबाधितांची संख्या ५ हजार ४५५ ने वाढली असून मृतांची संख्या ९६ वरुन २७८ झाली आहे. त्यामुळे शहरातील मृत्यूदर हा ३.१३ वरून ३.२६ पर्यंत वाढला आहे.

९ जूनला नवी मुंबईत करोनाबाधितांची संख्या ३०६३ होती तर करोनामुळे ९६ मृत्यूमुखी पडले होते. राज्यशासनाने ८ जूननंतर मिशन बिगीन अगेन सुरू केल्यानंतर नागरीक सामाजिक अंतराच्या नियमांत बेफिकिरी दाखवू लागल्याचे चित्र पाहायला मिळाले. त्यामुळे महिनाभरात रुग्णसंख्या दिवसाला सरासरी २००च्या जवळपास  नवे रुग्ण वाढले. याच वेळी मृत्यूचे प्रमाणही वाढले. जूनच्या पहिल्या आठवडय़ापर्यंत एकूण ९६ मृत्यू होते. दिवसाला सरासरी २ ते ३ असे मृत्यूचे प्रमाण होते. मात्र, महिनाभरात मृतांची संख्या ९६ वरून २७८ झाली आहे. त्याच वेळी ५०८३ जण करोनामुक्त झाले आहेत. शहरात करोनामुक्त होणाऱ्यांची संख्याही झपाटय़ाने वाढत आहे. रुग्ण बरे होण्याचा दर ६० टक्के आहे.  शहरात करोनामुळे  मृत्यू झालेल्यांचा दर हा महापालिकांच्या तुलनेत कमीच आहे. तो अधिक कमी करण्यासाठी पालिका प्रयत्नशील आहे. नागरिकांनी नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन नवी मुंबई पालिका आयुक्त    अण्णासाहेब मिसाळ यांनी केले.

खाटांच्या संख्येत वाढ

शहरात सापडणाऱ्या रुग्णांमध्ये करोनाची लक्षणे नसलेले रुग्ण दिसून येत आहेत. कोविड रुग्णालयात प्राणवायू पुरविण्याची सुविधा असलेल्या खाटा आणि अतिदक्षता विभागांची संख्याही वाढविण्यात आली आहे. पालिका अधिकारी आणि आरोग्य सेवेतील करोना योद्धे कार्यरत आहेत.त्यामुळे पावसाळ्यात  शहरातील ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांची काळजी घेण्याचे आवाहन पालिका करीत आहे.

’ ९ जूनपर्यंतचा मृत्यूदर : ३. १३ टक्के

’ ९ जुलै रोजी मृत्यूदर : ३.२६ टक्के

’ करोनामुक्तीचा दर : ६० टक्के