दिघा येथील इलठण पाडा परिसरात ब्रिटिशांनी सुमारे १५० वर्षांपूर्वी डोंगरात दगडी बंधारा बांधून धरण बांधले आहे. या धरणाला आता अनधिकृत झोपडय़ांचा विळखा पडला आहे. धरणाच्या बाजूला असणाऱ्या वन विभागाच्या व एमआयडीसीच्या भूखंडावर झोपडय़ांचे अतिक्रमण वाढत चालले असून त्याकडे संबंधित अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याबद्दल परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.
इलठण पाडा येथे ब्रिटिशकालीन धरणाजवळ एमआयडीसी व वन विभागांचा भूखंड आहे. या धरणाच्या पाण्याचा रेल्वे आता उपयोग करत नाही. या धरणाकडे रेल्वेचे तसेच एमआयडीसी, वन विभाग प्रशासकीय यंत्रणेचे दुर्लक्ष असल्यामुळे भूमाफियांनी ही जागा बळकावण्यास घेतली आहे. येथे अनधिकृत झोपडय़ा उभारण्याचा सपाटा त्यांनी लावला असून झोपडय़ा ५ ते ६ लाखांपर्यंत विकल्या जात आहेत. धरणाच्या पाण्याचा वापरही सर्रासपणे येथे केला जात आहे. यासंदर्भात दिघा विभाग अधिकारी गणेश आघाव यांच्याशी संपर्क साधला असता एमआयडीसी व वन विभागाला झोपडय़ा वाढत असल्याबद्दल कळवले असल्याचे त्यांनी सांगितले. या झोपडय़ांवर कारवाई कधी होईल याच्या प्रतीक्षेत येथील नागरिक आहेत