नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्टीकरण
नवी मुंबईतील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळ हा देशाचा प्रकल्प असून त्यामध्ये येणाऱ्या सर्व अडचणी सोडविण्यास प्राधान्य दिले जाणार आहे. त्यात प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांना अग्रस्थान राहणार असून येत्या दोन महिन्यात प्रकल्पाच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात केली जाणार आहे. यावेळी कोणीही विमानतळाच्या कामाला अडथळा आणता कामा नये अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रायगड जिल्ह्य़ातील प्रकल्पग्रस्त नेत्यांना कानपिचक्या दिल्या.
विमानतळाचे काम सुरू होण्यास आता काही महिन्याचा कालावधी असून जुलै महिन्यात या प्रकल्पाची आर्थिक निविदा दाखल होणार आहेत. त्यामुळे गेली वीस वर्षे रखडलेल्या प्रकल्पाचे काम दृष्टीक्षेपात आले आहे. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांनी नैना क्षेत्रातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींची एक बैठक बुधवारी मुख्यमंत्र्यांसमवेत आयोजित केली होती. विमानतळ प्रकल्पग्रस्तांना सिडकोने सर्वात्तम पॅकेज दिलेले आहे पण या पॅकेजची अंमलबजावणी व प्रकल्पग्रस्तांचे पुर्नवसन-पुर्नस्थापनेचे काही प्रश्न काही अंशी शिल्लक आहेत. यावरुन प्रकल्पग्रस्तांमध्ये धुसफूस सुरु असून सिडकोला कोंडीत पकडण्याची व्यहूरचना आखली जात होती.
घरे बांधण्यासाठी भूखंड
प्रकल्पग्रस्तांच्या नवीन घरांसाठी पॅकेज मध्ये ठरल्याप्रमाणे प्रती चौरस मीटर रक्कम दिली जाणार असून त्यात वाढ करण्यासंर्दभात बांधकामाला सुरुवात झाल्यानंतर विचार केला जाणार आहे. सप्टेंबर २०१३ मध्ये केलेल्या सव्र्हेक्षणाप्रमाणे प्रकल्पग्रस्तांना नवीन घर बांधण्यासाठी भूखंड दिले जाणार आहेत. यात सुटलेल्या घरांचा विचार करण्यात यावा अशी मागणी प्रकल्पग्रस्त नेत्यांनी केली. खरोखर घरहीन राहणाऱ्या प्रकल्पग्रस्ताला घर देण्याचा सिडको नक्कीच प्रयत्न करेल असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. भाजपा सरकारच्या काळात या विमानतळावरील विमानांचा टेक ऑफ व्हावा यासाठी मुख्यमंत्री स्वत: या प्रकल्पाकडे लक्ष देऊन असल्याचे या बैठकीने स्पष्ट झाले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on May 26, 2016 2:55 am