अकरा दुचाकी खाक लोकसत्ता प्रतिनिधी नवी मुंबई : घणसोली गावातील अंकल स्मृती अपार्टमेंट या पाच मजली इमारतीला बुधवारी पहाटे भीषण आग लागली. या आगीत इमारतीच्या पहिल्या, दुसऱ्या मजल्यावरील घरांचे मोठे नुकसान झाले आहे. यात तळमजल्यावर वाहनतळातील ११ दुचाकी जळून खाक झाल्या आहेत. बुधवारी पहाटे सव्वातीन वाजण्याच्या सुमारास इमारतीच्या तळमजल्यावर मोटारसायकल उभ्या असलेल्या ठिकाणी अचानक आग लागली. त्यानंतर पहिल्या मजल्यावर याची झळ पोहोचली. येथील रहिवासी गणेश सकपाळ यांच्या घरातही आग पसरली. त्यानंतर दुसऱ्या मजल्यावर आग पसरली. त्यानंतर झोपेत असलेल्या रहिवाशांची पळापळा झाली. येथील नागरिक व अग्निशमन दलाच्या जवानांच्या मदतकार्यामुळे आग नियंत्रणात आणण्यात आली. आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचं अग्निशमन दलाने सांगितले. काही समाजकंटकांनी जाणीवपूर्वक आग लावली असावी असा संशय नागरिकांनी व्यक्त केला आहे. उरणमध्ये वाहनांची जाळपोळ? लोकसत्ता प्रतिनिधी उरण : येथील भवरा विभागात सोमवारी रात्री आठ दुचाकी जाळल्याची घटना घडली आहे. सागरी मोरा पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करीत आहेत. उरण नगरपालिकेचा एक भाग असलेल्या व शहरापासून काही अंतरावर असलेल्या भवरा येथील घरासमोरील अंगणात उभी असलेली वाहने जाळण्यात आली आहेत. त्यामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. फटाक्यांमुळे आग लागल्याचा प्राथमिक आंदाज पोलीस निरीक्षक जगदीश कुलकर्णी यांनी व्यक्त केला आहे.