नवी मुंबई : अडीच वर्षे झाली तरी भाडेकराराचे नूतनीकरण न करता भाडे थकविले. अखरे जागा मालकाने कोपरखैरणेतील जिल्हा सहनिबंधक मुद्रांक कार्यालयास टाळे ठोकले. यामुळे ग्राहकांना मात्र मनस्ताप सहन करावा लागत आहे.

कोपरखैरणे सेक्टर १९ सी येथील शांती सुमन इमारतीत रामा पाटील यांच्या जागेत आठ वर्षांपासून हे कार्यालय आहे. या जागेचा भाडे करारनामा दोन वर्षांपूर्वीच संपला आहे. भाडेकराराचे नूतनीकरण करीत नियमित भाडे सुरू करा अशी जागा मालकाची मागणी आहे. त्यांनी ठाणे जिल्हा प्रशासनालाही याबाबत कळविले आहे. प्रशासनाने जागेचे भाडे तीन वर्षे उशिरा अदा केले. त्यामुळे जागामालकाने विलंबशुल्काची मागणी केली. दरम्यान प्रशासनाने परस्पर वीजपुरवठा यंत्रणेत बदल केल्याने वीजवाहिनी जळाली. याचा भुर्दंड जागामालकाला सोसावा लागला. अखेर जागामालकाने या कार्यालयालाच नोटीस लावून टाळे ठोकले. जागेच्या भाडय़ावरच आमचा उदरनिर्वाह चालत आहे. त्यामुळे प्रशासनाने त्वरित ठोस भूमिका घ्यावी, अशी जागामालक राम पाटील यांची मागणी आहे. मात्र मुद्रांक नोंदणी कार्यालययाने या कृतीविरोधात पोलिसांकडे तक्रार केली आहे.

शासन नियमानुसार भाडे व भाडेकरार असतो. मात्र जागामालक त्यांच्या अटी घालत आहे. ते नियमबा आहे. आतापर्यंत जो वापर झाला त्याचे नियमानुसार भाडे दिले जाईल. आम्हीही नवीन जागा शोधली असून त्याच भागात लवकरच कार्यालय सुरू होईल.

-मनोज वाईकांत, सहप्रबंधक