कमी आवक झाल्याने २० टक्के दरवाढ

नवी मुंबई थंडीमुळे एपीएमसीच्या भाजीपाला बाजारात भाज्यांची आवक कमी होत आहे. त्यामुळे फरसबी, गवार, कारले या भाज्यांची दर २० टक्क्यांनी वाढले असल्याची माहिती घाऊक भाजीपाला व्यापाऱ्यांनी दिली.

भाजीपाला बाजारात दररोज ५५० ते ६०० गाडय़ा भाजीपाला येत असतो. मात्र ५०० ते ५२५ गाडय़ांची नोंद झाली आहे. त्यात फरसबी, गवार आणि कारले यांची आवक ३० ते ४० टक्के घटली आहे. थंडीमध्ये भाज्यांचे उत्पादन कमी होते, त्यामुळे होणारी आवक कमी झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे या भाज्यांच्या दरात २० टक्क्यांनी वाढ झाली आहे.

फरसबी ४० ते ४४ रुपये प्रतिकिलो होती. ती आता ५० ते ५५ रुपयांवर गेली आहे. ३२ ते ३६ वरून ३६ ते ४० रुपये, तर कारली ३६ वरून ४० ते ४४ रुपयांवर आली आहेत.

किरकोळ बाजारातही याचा परिणाम जाणवत असून तेथेही २० टक्क्यांनी या भाज्यांचे दर वाढले आहेत. ४० रुपयांनी प्रतिकिलो मिळणारी फरसबी ६०, तर कारली ५० वरून ६० व गवारी ८० रुपयांनी विकली जात आहे.

एपीएमसी बाजारात थंडीमुळे भाज्यांची आवक कमी होत आहे. यामध्ये प्रामुख्याने फरसबी, कारली आणि गवार या भाज्यांचे दर २० टक्के वाढले असल्याचे भाजीपाला व्यापारी महासंघाचे कैलास तांजणे यांनी सांगितले.